यवतमाळातील चिलगव्हाण येथे पाळले जाते ‘सुतक’

नितीन पखाले, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी व शेतकरी स्वातंत्र्याचा संकल्प बळकट करण्यासाठी लाखो स्त्री-पुरुष गेल्या सात वर्षांपासून १९ मार्च रोजी अन्नत्याग, उपवास, उपोषण आंदोलन करतात. महाराष्ट्रात गावोगावी, देशातील काही राज्यात, विदेशात गेलेले काही किसानपूत्र हे आंदोलन करतात. महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील एका शेतकरी कुटुंबाच्या सामूहिक आत्महत्येस उद्या रविवारी १९ मार्च रोजी ३७ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन आयोजित केले आहे.

हेही वाचा >>> बुलढाणा: साखरझोपेत सर्पदंश; तरुणाचा चार तासातच मृत्यू

 महागाव तालुक्यात असलेल्या चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी पत्नी मालती व चार मुलांसह १९ मार्च १९८६ रोजी पवनार (जि. वर्धा) येथील आश्रमात  आत्महत्या केली होती. या आत्महत्येस अनेक वर्ष उलटूनही कृषी विषयक धोरणे राबवण्यिासाठी ठोस उपाययोजना झाल्या नसल्याने राज्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होवून ही संख्या आता साडेचार लाखांवर गेली आहे. या आत्महत्यांची दखल घेत शासनाचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी किसानपूत्र आंदोलनाचे प्रणेते, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अमर हबीब यांच्या संकल्पनेतून ‘किसानपूत्र’ आंदोलनाच्या माध्यमातून २०१७ पासून राज्यात ‘जगाच्या पोशिंद्यासाठी एक दिवस अन्नत्याग आंदोलन’ सुरू करण्यात आले. पहिल्या वर्षी अमर हबीब यांनी चिलगव्हाण येथे आपल्या कार्यकर्त्यांसह अन्नत्याग आंदोलन केले. त्यानंतर पवनार, राजघाट (दिल्ली) पुणे, आंबाजोगाई आदी ठिकाणी बसून त्यांनी अन्नत्याग उपोषण केले. यावर्षी किनगाव (जळगाव) ते धुळे अशी ११० किमी पदयात्रा काढून धुळे येथे रविवारी उपवास करणार आहेत.  १९ मार्च रोजी अन्नत्याग आंदोलन ही आता चळवळच बनली आहे.

हेही वाचा >>> नागपूर: ‘ती’ चित्रफीत अर्धवट, जागा वाटपाबाबत काहीच ठरले नाही! चंद्रशेखर बावनकुळे यांची सारवासारव

या दिवशी चिलगव्हाण येथे घरासमोर काळी रांगोळी काढून, काळ्या गुढ्या उभारून शासनाच्या धोरणांचा निषेध केला जातो. संपूर्ण गावात एकाही घरी चूल पेटत नाही. साहेबराव करपे यांच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुतक पाळून अन्नत्याग उपोषण केले जाते. या उपोषणात सर्व गावकरी  सहभागी होतात.   सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकऱ्यांच्या ‘आत्महत्या’ या खरेतर व्यवस्थेने पाडलेले ‘खून’ आहेत, असा आरोप अमर हबीब यांनी केला आहे. शेतकरी आत्महत्यांच्या तळाशी शेतकरी विरोधी नरभक्षी कायदे आहेत. शेतकरी आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती आहे. हे अन्नत्याग आंदोलन कोण्या राजकीय पक्षाचे किंवा संघटनेचे नाही. राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी आपण आपले सारे मतभेद विसरून एकत्र आले पाहिजे या भावनेने  या  आंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन हबीब यांनी केले आहे. उद्या रविवारी यवतमाळ येथे सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीत महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर तर महागाव येथे तहसील कार्यालयात दिवसभर हे अन्नत्याग आंदोलन करण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmer organized protest on background on complete of 37 year of first farmer family suicide nrp 78 zws