लोकसत्ता टीम

चंद्रपूर: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही. विमा कंपनी शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास टाळाटाळ करीत आहे. तेव्हा कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून द्यावा अशी मागणी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही व सावली या तालुक्यात सन २०२३-२४ मध्ये शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. याची तक्रार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी संबंधितांकडे नोंदवली. मात्र पिक विमा कंपन्यांकडून अद्यापही हजारो लाभार्थ्यांना पिक विम्याचा लाभ मिळालेला नसून ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित पीक विम्याचा लाभ देण्यात यावा. असे राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे कृषिमंत्री व सचिव यांना पत्रातून कळविले आहे.

आणखी वाचा-विधानसभा निवडणूक : भाजप ‘ॲक्शन मोड’वर, अकोल्यात आज संघटनात्मक आढावा

सन २०२३-२४ मध्ये ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातील ब्रह्मपुरी ,सावली व सिंदेवाही या तालुक्यांमध्ये नैसर्गिक आपत्तीतून शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे येथील शेतकऱ्यांना याचा प्रचंड आर्थिक फटका बसला. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पिक विमान काढणाऱ्या अनुक्रमे सावली तालुक्यातून एकूण २८ हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असून पिक विमा कंपनीकडून पाहणी अंति ७ हजार ५०० शेतकऱ्यांच्या तक्रार प्रकरणांना मंजूरी देण्यात आली.

आणखी वाचा-वर्धा : चार दशकाची पायपीट एकदाची थांबली! पावसाळ्यात वाहून जाण्याची…

तर सध्या स्थितीत ७ हजार ५०० नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकी केवळ २ हजार ५०० शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ देण्यात आला असून उर्वरित ५ हजार शेतकरी अद्यापही विमा लाभाच्या प्रतीक्षेत आहेत. तसेच ब्रह्मपुरी तालुक्यात एकूण ४० हजार २६४ शेतकऱ्यांनी शेतीचा पिक विमा काढला. यापैकी ५ हजार ६४५ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तक्रार नोंद केली. यातून केवळ १ हजार ५७५ पिक विमा चा लाभ अदा करण्यात आलेला असून उर्वरित १६५ शेतकऱ्यांना अद्यापही विमा लाभ मिळालेला नाही. तर सिंदेवाही तालुक्यात पिक विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या एकूण २० हजार २६३ इतकी असून तक्रार नोंद झालेल्या ११ हजार ७१८ पैकी ९ हजार ४६५ शेतकऱ्यांना विमा लाभ मिळाला मात्र २ हजार २५३ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही विमा लाभ मिळालेला नाही.

याची गंभीर दखल घेत राज्याची विरोधी पक्ष नेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व सचिव यांना पत्र पाठवून पिक विमानातील पात्र मात्र लाभापासून अद्यापही वंचित असलेल्या शेतकऱ्यांना त्वरित लाभ देण्याचे कळविले आहे.