यवतमाळ : शेतकरी प्रश्नांबाबत व्यवस्थेच्या अनास्थेमुळे राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. शेतकऱ्यांसाठी लढणारे अनेक कार्यकर्ते राज्यात आहेत. या सर्व कार्यर्त्यांना एकत्र आणून ज्यांच्यामागे जनाधार आहे, अशा तरूणांना विधानसभेत पाठविण्याचा प्रयत्न आहे. त्यासाठी आपण राज्यात दौरा करत असून किमान २५ विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांची मुलं निवडणूक लढतील, अशी माहिती शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिली.

या दौऱ्यानिमित्त रविकांत तुपकर हे यवतमाळ येथे आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे रस्त्यावर उतरणारे जे तरुण आहेत आणि ज्यांच्यामागे जनाधार आहे, असे तरुण विधानसभेत गेले पाहिजे. यासाठी आपण राज्याचा दौरा करीत आहोत. या दौऱ्यात अनेक तरूण कार्यकर्ते भेटत आहेत. त्यांना आपण बळ देत आहोत. अनेकजण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्वतंत्र किंवा विविध संघटनांच्या माध्यमातून आंदोलन करून सरकारला जाब विचारत आहेत. अशा तरूणांना संघटित करून त्यांना राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले पाहिजे, असे रविकांत तुपकर म्हणाले. राज्यातील किमान २५ विधानसभा मतदारसंघात शेतकरी आंदोलक कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

हे ही वाचा…संतापजनक ! अल्पवयीन मुलासोबत गोडाऊनमध्ये केले अनैसर्गिक कृत्य ; अखेर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

लोकसभा निवडणुकीत जनतेने आपल्याला मोठी साथ दिली. विरोधी उमेदवारास आपण जोरदार टक्कर दिली. समविचारी पक्षाच्या नेत्यांनी मदत केली असती तर ही जागा आपण दोन लाखाच्या फरकाने जिंकलो असतो, असे तुपकर यांनी सांगितले. आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे.

युती – आघाडी दोन्ही पर्याय खुले

बुलढाणा, चिखली आणि सिंदखेडराजा या तिन्ही विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, अशी जनतेची, शेतकऱ्यांची व कार्यकर्त्यांची आग्रही मागणी आहे. सध्या स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची तयारी सुरू आहे. मात्र निवडणुकीपर्यंत कोणी विचारणा केल्यास महाविकास आघाडी किंवा महायुती हे सर्व पर्याय आपल्यासाठी खुले आहेत, असे त्यांनी सांगितले. या संदर्भात आपली कोअर कमिटी निर्णय घेईल, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जे आमच्यासोबत सकारात्मक चर्चा करतील, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देतील, त्यांच्या पर्यायाचाही आपण विचार करू, असे तुपकर यांनी सांगितले. तिसऱ्या आघाडीचा आपल्यासाठी विषयच नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी हाच आपला गॉडफादर आहे. त्याच्याशिवाय कोणी राजकीय गुरू नाही. सामान्य शेतकरी जे सांगतील ते ठरवू, असे ते म्हणाले.

हे ही वाचा…रतन टाटांनी संघ मुख्यालयाला दिली होती भेट, टाटांच्या निधनावर सरसंघचालकांना दु:ख, म्हणाले…

पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच विदर्भात दोनवेळा येऊन गेले. मात्र त्यांनी येथे शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात अवाक्षरही काढले नाही. वाशीम हा शेतकरी आत्महत्याग्रस्त पट्टा आहे. मात्र पंतप्रधानांनी येथे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली, अशी टीका तुपकर यांनी केली. राज्यातील शेतकरी सुखी व्हावा, हीच आपली इच्छा आहे. आजपर्यंत अनेकांनी शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण केले. मात्र आपल्याला राजकारणापेक्षा शेतकऱ्यांचे हित अधिक महत्वाचे आहे, असे रविकांत तुपकर म्हणाले.