नागपूर : मेडिकलशी संलग्नित बी.एससी नर्सिंगच्या दोन विद्यार्थिनींनी निकृष्ट पाणीपुरी खाल्ली होती. त्यापैकी एकीचा गॅस्ट्रोएन्टेरायटीसने मृत्यू झाला. विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर आता अन्न व सुरक्षा विभागाच्या (एफडीए) अन्न शाखेला जाग आली असून या विभागाने शनिवारी मेडिकल प्रशासनाला या प्रकरणाची माहिती मागितली.
नागरिकांना सुरक्षित अन्न मिळावे व निकृष्ट खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी एफडीएची अन्न शाखा काम करते. परंतु या शाखेकडे मनुष्यबळाचा अभाव असल्याने आजही निकृष्ट खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. जिल्ह्यातील निम्याही फेरीवाल्यांनी एफडीएकडे नोंदणी केलेली नाही. असे असतानाच मेडिकलमधील बी.एससी नर्सिंगच्या दोन विद्यार्थिनींनी मेडिकल चौकात पाणीपुरी खाल्ली. यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यापैकी जम्मू कश्मीरच्या एका मुलीचा मृत्यू झाला. त्यामुळे एफडीएचे अधिकारी मेडिकलला पोहोचले. त्यांनी अधिकाऱ्यांना या विद्यार्थिनींवर केलेल्या उपचाराची माहिती मागितली. त्यांनी कुठून पाणीपुरी खाल्ली, याबाबतही विचारणा करण्यात आली.
परंतु, उपचार घेतलेल्या विद्यार्थिनीशी प्रत्यक्ष संवाद साधून पाणीपुरीवाल्यांचा शोध घेणे अपेक्षित असताना एफडीए मेडिकलवर जबाबदारी ढकलत असल्याची चर्चा मेडिकलमधील अधिकाऱ्यांच्या वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे एफडीएच्या कामावर गंभीर प्रश्नही उपस्थित केला जात आहे.