नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्प, मानसिंग देव अभयारण्य आणि मध्यप्रदेशातील खवासा येथील मोगली लँड व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या नागपूर ते अलाहाबाद या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र, उमरेड-क-हांडला अभयारण्यातून जाणाऱ्या नागपूर ते आरमोरी या महामार्गाचे काम करणे केंद्र सरकारला जड जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

राज्याची उपराजधानी नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग ३५३ डीचे काम अर्धवट आहे. हा राष्ट्रीय महामार्ग नागपूर-आरमोरी (जि. गडचिरोली) असा आहे. या महामार्गावरील उमरेड ते नागभीड या ४२ किलोमीटर खंडाचे काम रखडले आहे.उमरेड-क-हांडला अभायारण्य असल्याने आणि येथून वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग असल्याने महामार्गाच्या रुंदीकरणाला वन खात्याने विरोध केला आहे.या महामार्गावरील नागपूर ते उमरेड या ४१ किलोमीटर लांबीचे चौपदरीकरण झाले आहे.

आणखी वाचा-NEET परीक्षा कधी होणार ‘नीट’? निकालातील घोळ व गैरव्यवहाराविरोधात चंद्रपुरात हजारो विद्यार्थी रस्त्यावर

तसेच नागभीड-ब्रम्हपुरी – आरमोरी या खंडाचे (३५३ डी) या राष्ट्रीय महामार्गाचे काम चार वर्षांपूर्वीच पूर्ण झाले. मात्र, नागभीड-उमरेड या राष्ट्रीय मार्गाचे काम रखडले आहे. नागपूर ते अलाहाबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम पेंच व्याघ्र प्रकल्प, मानसिंग देव अभयारण्य आणि मध्यप्रदेशातील खवासा येथील मोगली लँड या व्याघ्र प्रकल्पातून जातो. तेथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्याची दखल घेतली होती. त्यानंतर शमन उपाय करून महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले. त्या धर्तीवर नागपूर आणि गडचिरोली दरम्यानच्या या महामार्गाचे काम का केले जाऊ शकत नाही, असा प्रश्न विचारला जात आहे.

आणखी वाचा-राज्यातील शेकडो शिक्षकांवर पुन्हा अतिरिक्त होण्याची वेळ, काय आहे कारण वाचा

या महामार्गाने संपूर्ण गडचिरोली जिल्हा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी, नागभीड, मूल, सिंदेवाही, तळोधी येथील नागरिक हजारो वाहनांनी या मार्गाने रोज प्रवास करत आहेत. मात्र या वाहनांना हा मार्ग छोटा पडत आहे. अनेक अपघात या मार्गावर घडत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या मार्गाची अवस्था बघून या मार्गास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्यात आला व नागपूरपासून उमरेडपर्यंत आणि आरमोरीपासून नागभीडपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे कामही पूर्ण करण्यात आले आहे.पेंच व्याघ्र प्रकल्पातून नागपूर ते अलाहाबाद राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यात आले आहे. वन्य प्राण्याच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या भ्रमण मार्गाच्या ठिकाणी उड्डालपूल, भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर उमरेड-भिवापूर-नागभीड दरम्यान उपायोजना करून हा महामार्ग तातडीने तयार करण्यासाठी पाठपुरावा करण्यात यईल, असे रामटेकचे नवनिर्वाचित खासदार श्यामकुमार बर्वे म्हणाले.