लोकसत्‍ता टीम

अमरावती : अपेक्षेनुसार अमरावती विधानसभा मतदारसंघातून माजी राज्‍यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली आणि तब्‍बल पंधरा वर्षांच्‍या प्रतीक्षेनंतर काँग्रेसच्‍या उमेदवारीचे त्‍यांचे वर्तुळ पूर्ण झाले. त्‍यांचा राजकीय प्रवास नाट्यपूर्ण आहे. २००९ मध्‍ये उमेदवारी नाकारण्‍यात आल्‍यानंतर त्‍यांनी केलेले बंड देशभर गाजले होते. २०१४ च्‍या निवडणुकीआधी त्‍यांनी भाजपमध्‍ये प्रवेश करून विजय देखील मिळवला होता, पण २०१९ च्‍या निवडणुकीत त्‍यांना पराभवाचा धक्‍का सहन करावा लागला. २०२१ मध्‍ये ते स्‍वगृही परतले. तब्‍बल पंधरा वर्षांनंतर काँग्रेसच्‍या उमेदवारीची त्‍यांची इच्‍छा पूर्ण झाली आहे.

डॉ. सुनील देशमुख हे विद्यार्थी चळवळीपासून काँग्रेस पक्षासोबत जुळलेले. त्‍यांनी १९७८ मध्‍ये एनएसयुआयचे प्रदेश अध्‍यक्षपद भुषवले. त्‍यानंतर त्‍यांना युवक काँग्रेसच्‍या प्रदेशाध्‍यक्षपदी काम करण्‍याची संधी मिळाली. १९९९ मध्‍ये ते भाजपचे मातब्‍बर नेते जगदीश गुप्‍ता यांचा पराभव करून आमदार बनले.

आणखी वाचा-काँग्रेसकडून बहीण बेदखल, भावाला आमदारकीची डबल हॅटट्रिक करण्याची संधी…

काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये कॅबिनेटचा दर्जा असणाऱ्या पाटबंधारे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. त्यानंतर २००४ मध्ये ते अर्थराज्य मंत्री राहिले. पण आघाडी सरकारमध्ये अर्थराज्य मंत्री असताना २००९ मध्ये अमरावतीतून त्‍यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तत्‍कालीन राष्‍ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांना काँग्रेसने उमेदवारी बहाल केली. त्‍याविरोधात त्‍यांनी बंड केले आणि शेखावत यांच्‍या विरोधात निवडणूक लढवली. त्‍यांच्‍या या बंडाची देशभर चर्चा झाली. राष्‍ट्रपतींच्‍या पुत्राला आव्‍हान देण्‍यात आल्‍याने अमरावतीची निवडणूक गाजली. पण, या निवडणुकीत त्‍यांना पराभव पत्‍करावा लागला. त्‍यांना काँग्रेसमधून निलंबित करण्‍यात आले. काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर सुनील देशमुख यांनी जनविकास काँग्रेसची स्थापना केली. २०१४ मध्‍ये त्‍यांनी अधिकृतपणे भाजपमध्‍ये प्रवेश केला आणि भाजपच्‍या उमेदवारीवर निवडणूक लढवली.

आणखी वाचा-मूर्तिजापूरमध्ये राष्ट्रवादीकडून सम्राट डोंगरदिवेंना उमेदवारी, पक्षात नव्याने आलेल्यांना संधी

डॉ. सुनील देशमुख यांच्या माध्यमातून भाजपाने तब्‍बल २५ वर्षांनंतर अमरावती विधानसभा मतदारसंघ काबीज केला. २०१९ च्या निवडणुकीत मात्र काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके यांना अमरावती विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आणि या निवडणुकीत भाजपाचे डॉ. सुनील देशमुख यांचा पराभव झाला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या दोन वर्षांत पुन्हा एकदा डॉ. सुनील देशमुख हे काँग्रेसमध्ये परतले.

त्‍यांचा सामना आता महायुतीतील राष्‍ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्‍या सुलभा खोडके यांच्‍यासोबत होणार आहे. भाजपचे नेते जगदीश गुप्‍ता हे बंडाच्‍या तयारीत आहेत. त्‍यामुळे तीन दिग्‍गजांमधील लढाई रंजकदार ठरणार आहे.