अकोला : वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरातील गुरु मंदिर तीर्थक्षेत्र प्रस्तावित १७० कोटी तर श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रकल्प एक व प्रकल्प दोनसाठी ७२३ कोटी असे एकूण ८९३ कोटींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी ग्रामविकास व पर्यटन विभागाने सुधारित नियमावली करावी. त्यामुळे सर्वसमावेशक प्रस्ताव जिल्ह्यांकडून सादर होतील, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीर्थक्षेत्र विकास आराखडा बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मृद  व जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार संजय देशमुख, आमदार सई डहाके यांच्यासह विविध देवस्थान मंदिराचे कार्यवाहक उपस्थित होते.

वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरातील गुरु मंदिर तीर्थक्षेत्र विकास आणि श्री संत सेवालाल महाराज पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील दोन्ही प्रकल्पाच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. ही कामे गतीने करण्यासाठी संबंधित विभागांनी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे सादर करताना कमीत कमी खर्चात चांगल्या दर्जाची कामे करण्यासाठी प्रशासनाने भर द्यावा. कोणताही प्रस्ताव सादर करताना भविष्यातील गरजा आणि त्या परिसरातील आवश्यकता लक्षात घेऊन प्रस्ताव सादर केले जावेत.

ग्रामविकास, पर्यटन विभाग त्याचप्रमाणे या विषयाशी संबंधित इतर विभागांनी तीर्थक्षेत्र विकास आराखडा बनवताना नवीन मार्गदर्शक तत्वे जारी करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. या बैठकीला वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. के. एच.गोविंदराज, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्री यांचे प्रधानसचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक मनोज सूर्यवंशी, दूरदृश्यप्रणालीद्वारे वाशीमच्या जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. वाशीम जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी निधी मंजूर झाल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला आहे. तीर्थक्षेत्रांची विकास कामे दर्जेदार व जलदगतीने होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.