गडचिरोली : वह्या, पेन घेऊन आयुष्य घडविण्याऐवजी हाती शस्त्र घेत हिंसेचा मार्ग स्वीकारून वयाच्या १४ व्या वर्षी नक्षल सदस्य ते एरिया कमिटी मेंबर (एसीएम) अशी मजल मारणारी ‘रजनी’ अखेर लग्नबंधनात अडकली. १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर पोलिसांच्या पुढाकाराने एका शेतकरी तरुणाने तिच्याशी लग्नाची रेशीमगाठ बांधली अन् सुरु झाला तिच्या ‘स्वातंत्र्या’चा खरा प्रवास.

रजनी ऊर्फ कलावती समय्या वेलादी (२८, रा. ईरुपगुट्टा, पो. भोपालपट्टनम जि. बिजापूर (छत्तीसगड) नाव तिचं. कैलास मारा मडावी (२६, रा. एलाराम, देचलीपेठा ता. अहेरी ) या शेतकरी तरुणाने तिला आयुष्यभरासाठी पत्नी म्हणून स्वीकारले.

हेही वाचा – Nagpur Rain News: रक्षाबंधनावर पावसाचं सावट! हवामान खातं काय म्हणतंय जाणून घ्या…

महिला नक्षलवादी रजनी ऊर्फ कलावती वेलादी हिने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले होते. तिच्यावर महाराष्ट्र व छत्तीसगड शासनाचे मिळून एकूण ११ लाख रुपयांचे बक्षीस होते. तब्बल १४ वर्षे रजनी नक्षलवादी चळवळीत कार्यरत होती. तिच्यावर ६ गुन्हे नोंद झाले होते. निरपराध व्यक्तीचा खून, चकमकीसह शासकीय बसची जाळपोळ अशा गंभीर गुन्ह्यांत तिचा सहभाग होता. दरम्यान, आत्मसमर्पणानंतर तिने वैवाहिक आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. कैलास मडावी याने तिला पत्नी म्हणून स्वीकारले.

नातेवाईकांच्या बैठकीत दोघांनी लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर पोलिसांनीही त्यांना प्राेत्साहन दिले. १६ ऑगस्ट २०२४ रोजी शहरातील प्रसिद्ध सेमाना हनुमान मंदिरात पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख यांच्या साक्षीने पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे विवाह समारंभ पार पडला. आत्मसर्मपण शाखेचे प्रभारी अधिकारी नरेंद्र पिवाल व अंमलदार विविध शाखांचे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी या सोहळ्यात परिश्रम घेतले.

दोघांनाही भेटवस्तू देऊन आशीर्वाद दिले

या अभूतपूर्व विवाह सोहळ्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला. रजनी वेलादी व कैलास मडावी या दोघांचेही समुपदेशन करुन त्यांना वैवाहिक जीवन सुरु करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. लग्न सोहळ्याला दोघांचेही मोजके नातेवाईक व पोलीस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी वऱ्हाडी म्हणून उपस्थित होते. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी लग्नानंतर दोघांनाही भेटवस्तू देऊन नांदा सौख्यभरे, असा आशीर्वाद दिला.

हेही वाचा – भाजपमधील मोठ्या नेत्यांच्या नावाचा वापर करून डॉ. कल्पना पांडे यांची मनमानी, ‘यांनी’ केला आरोप

वैवाहिक जीवनाला आडकाठी

नक्षल चळवळीत लग्न करण्यास विरोध केला जातो. त्यामुळे वैवाहिक आयुष्य जगता येत नाही. महिला नक्षलवाद्यांवर वरिष्ठ अन्याय, अत्याचार करतात, त्यास कंटाळून अनेक जहाल महिला नक्षलवादी आत्मसमर्पण करुन सामान्यांप्रमाणे आयुष्य जगत आहेत, असे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.