गडचिरोली : २१ ऑक्टोबरला गडचिरोली- छत्तीसगड सीमेवर झालेल्या चकमकीत ठार झालेल्या ५ नक्षलवाद्यांची ओळख पटली असून यात दोन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, गडचिरोली पोलिसांनी पहिल्यांदाच नक्षलवाद्यांचा गड समजल्या जाणाऱ्या अबुडमाडमध्ये शिरून ही कारवाई केली, अशी माहिती मंगळवारी पोलीस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल पारिसरात नक्षलावादी मोठ्या संख्येने एकत्र जमले होते. हा परिसरात छत्तीसगड नारायणपूर जिल्ह्याला लागून असून अबुझमाडमध्ये येतो. नक्षल्यांच्या हालचालीवर गडचिरोली पोलिसांनी गेल्या आठवडाभरापासून लक्ष ठेवले होते. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवण्यासाठी नक्षलवादी गडचिरोलीत प्रवेश करणार अशी माहिती मिळताच पोलिसांनी या भागात अभियान राबवले होते. ही चकमक गडचिरोली आणि नारायणपूर हद्दीत झाली. यासाठी सी ६० जवानांनी घनदाट जंगलातून तब्बल २२ किमी पायी प्रवास केला. चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये कंपनी क्रमांक १० ची विभागीय समिती सदस्य जया उर्फ भुरी पादा (३१, उलिया छत्तीसगड ) आणि पुरवठा विभागाचा समिती सदस्य तसेच वरिष्ठ नक्षल कमांडर सावजी उर्फ दसरू तुलावी (६५, गुरेकसा, गडचिरोली ) या दोन मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. तर उर्वरित देवे रिता(२५), बसंत आणि सुखमती हे छत्तीसगडमधील रहिवासी होते. यांच्यावर एकूण ३८ लाखांचे बक्षीस होते. चकमकीत पायाला दोन गोळ्या लागल्यामुळे सी ६० जवान कुमोद आत्राम जखमी झाला. त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे.

हेही वाचा : गडचिरोली पोलिसांनी घातपाताचा मोठा कट उधळला, चकमकीत पाच नक्षल्यांना कंठस्नान

पत्रकार परिषदेला विशेष पोलीस महानिरीक्षक नक्षलविरोधी अभियान संदीप पाटील, गडचिरोली परीक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक अभियान अंकित गोयल, पोलीस उपमहानिरीक्षक सीआरपीएफ अजय कुमार उपस्थित होते.

सावजी तुलावीवर २२६ गुन्हे

चकमकीत ठार झालेला सावजी तुलावी या नक्षल कमांडरवर खून, जाळपोळप्रकरणी तब्बल २२६ गुन्हे दाखल होते. ६५ वर्षीय सावजी हा गेल्या ४० वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय होता. त्याने चळवळीत विविध पदावर काम केले आहे. सद्या तो कंपनी क्रमांक १० मध्ये पुरवठा विभागात कार्यरत होता. त्याच्यावर १६ लाखांचे बक्षीस होते. गेल्या वर्षभरात झालेल्या विविध चकमकीत आतापर्यंत २४ नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये पोलिसांना आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची मोठी मदत होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.