बुलढाणा : पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात दरवर्षी श्रींची पालखी सहभागी होते. पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रा महोत्सवात सहभागी होण्याचे संस्थानचे हे ५५ वे वर्ष आहे. परंपरेनुसार यंदाही श्रीसंत गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींची पालखी ज्येष्ठ शुद्ध सात म्हणजेच १३ जून रोजी सकाळी ७ वाजता प्रस्थान करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रींच्या पालखीत जवळपास सातशे वारकऱ्यांसह टाळकरी आणि पताकाधारी सहभागी होणार आहेत. हरीनामाच्या गजरात, मुखातून ‘जय हरी विठ्ठल, श्री हरी विठ्ठल’ नामाचा जप करीत पालखी संत नगरीतून पंढरपूरकडे प्रस्थान करेल. भूतलावरील वैकुंठ अशी ख्याती आणि महिमा असलेल्या पंढरपूरच्या विठोबाची महायात्रा आषाढी, कार्तिकी, चैत्र व माघी, अशा चार एकादशीला भरते. जो नित्याने वारंवार पंढरपूरला जातो तो वारकरी होय. श्रीसंत गजानन महाराजांच्या पुनीत वास्तव्याने पावन झालेल्या शेगाव नगरीला विदर्भाचे पंढरपूर म्हणून गौरविल्या जाते. पंढरीनाथाच्या भेटीसाठी प्रत्यक्ष शेगावच्या योगी गजाननाने हजारो वारकऱ्यांसह वारी केल्याचे दाखले मिळतात. त्यामुळे येथील वारीला असलेली परंपरा ही संतांनी दाखविलेल्या मार्गावर गेल्या ५५ वर्षांपासून अव्याहतपणे जपली जात आहे.

हेही वाचा >>>लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर काँग्रेसकडून कारवाईचा बडगा, प्रदेश सचिव निलंबित

ज्येष्ठ शुद्ध ७, अर्थात १३ जून रोजी महाराजांची पालखी विठूरायाच्या भेटीला मार्गस्थ होणार आहे. टाळ, मृदंग वाजत, गाजत शेकडो वारकरी हातात भागवत धर्माची पताका व मुखी हरी नामाचा गजर करीत श्रींच्या पालखीसह पंढरीची वाट धरतील. श्रींच्या दिडीमध्ये पताकाधारी, गायक, मुंदगवादक, सेवेकरी, अशा एकूण सातशे जणांचा समावेश असतो. या दिंडीमध्ये एक विणेकरी आणि स्वयंशिस्तीने टाळकरी व पताकाधारी चालत असतात. मजल दरमजल करत ठरलेल्या ठिकाणी मुक्काम, तेथे भजन, कीर्तन, प्रवचन करीत भागवत धर्म वाढवण्याचा प्रयत्न करतात. मार्गावरील अनेक छोट्या-मोठ्या गावांना आनंदात सहभागी होण्याचे भाग्य मिळते.

पालखी यात्रेची दैनंदिनी

दिवसभर वारी आणि रात्रीचा मुक्काम, मुक्कामाचे दिवस आणि गावे ठरलेली असतात. मुक्कामाच्या ठिकाणी सकाळी काकडा, हरीपाठ, रस्त्याने भजन, श्रीची आरती, प्रवचन आदी कार्यक्रम नित्य नियमाने रोज होतात. स्वागत, वारी करणारा व ते स्वागत पाहणारे भक्तही भारावून जातात. मजल दरमजल करत मुखी संताचे अभंग गात पाउले श्रद्धेने पंढरीकडे चालत असतात. पाऊस असो वा ऊन, वारा अथवा थंडी, चालताना विठ्ठल दर्शनाची आस हीच ऊर्जा वारकऱ्यांना पुरेशी असते. प्रत्यक्ष श्रीसंत गजानन महाराजांची पालखी सोबत असल्याने जणू सर्व सुखाचे आगर सोबत असल्याची भावना असते. तब्बल ३३ दिवसांचा पायी करून श्रींची पालखी आषाढ शुद्ध ९ म्हणजे १५ जुलै रोजी सोमवारी पंढरपुरी डेरे दाखल होणार आहे. यामुळे आनंदात न्हाऊन निघणारे शेकडो वारकरी पंढरीच्या भूमीवर पाय ठेवण्यापूर्वी तेथील माती कपाळाला लावून जणू विठ्ठलमयच होऊन जातात. त्यांच्या महिनाभराच्या पायदळ वारी,  खडतर वाटचालीचे चीज होते.

अकोल्यात दोन दिवस मुक्कामी

गुरुवारी सकाळी शेगाव येथून प्रस्थान करणारी पालखी दुपारी मध्यान्ही नागझरी येथे पोहोचणार आहे. संत गोमाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत या भूमीत महाप्रसाद घेतल्यावर पालखी पुढे मार्गस्थ होईल. पहिला मुक्काम पारस (जि. अकोला) येथे राहील. १४ जूनला पारस येथून गायगाव येथे महाप्रसाद आणि त्यानंतर भौराद येथे मुक्काम राहील. आजवरच्या परंपरेप्रमाणे पालखी १५ आणि १६ जून असे सलग दोन दिवस अकोला महानगरीत मुक्कामी राहणार आहे. यामुळे दोन दिवस राजेश्वर नगरी ‘गण गण गणात बोते’च्या गजराने गुंजणार आहे. लाखो अकोलावासी भक्तासाठी श्रींचा दीर्घ मुक्काम एक पर्वणीच ठरणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gajanan maharaj palanquin leaves for ashadhi tomorrowbuldhana 61 amy
Show comments