लोकसत्ता टीम

चंद्रपूर : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा मतदार संघावर दावा सांगतांना चंद्रपूर, बल्लारपूर किंवा चिमूर पैकी किमान एक विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडावा, अन्यथा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी पदाचा राजीनामा देतील असा इशारा दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे निरीक्षक दिलीप पनकुले यांनी घेतलेल्या बैठकीत हा इशारा देण्यात आला. या जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहायला सुरूवात झाली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहे. पक्षाचे निरीक्षक दिलीप पनकुले यांनी नुकतीच येथे स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.

आणखी वाचा-राज्यातील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षकांचे नियुक्ती आदेशही शासनच काढणार

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर अध्यक्ष दिपक जयस्वाल, युवक अध्यक्ष सुमित समर्थ, महिला आघाडी अध्यक्ष बेबी उईके, हिराचंद बोरकुटे, प्रदेश सरचिटणीस सुधाकर काटकर, शहर कार्याध्यक्ष अरुण निमजे, आसिफ सय्यद, योगराज कुथे, राजेंद्र वारघणे, रुषी हेपट, प्रदिप ढाले, शरद जीवतोडे, कैलास राठोड यांच्यासह सर्व आघाड्यांचे प्रमुख तथा तालुका पदाधिकारी उपस्थित होते. निरीक्षक पनकुले यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत काय स्थिती राहिल याची माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून घेतली.

लोकसभा निवडणुकीत सर्व सहाही विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या बाजूने मतदारांचा कौल आहे. तेव्हा आगामी विधानसभा निवडणुकीत बल्लारपूर विधानसभा मतदार संघासाठी आग्रह धरावा अशी मागणी लावून धरली. बल्लारपूर सोबतच चंद्रपूर व चिमूर या दोन जागांसाठी वैद्य यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी आग्रह धरला. मागील ४० वर्षापासून काँग्रेस या तिन्ही विधानसभा मतदार संघात निवडणुक लढत आहे आणि सातत्याने पराभवाचा सामना करित आहे. तेव्हा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला बल्लारपूर विधानसभेची जागा सोडावी तसेच चंद्रपूर व चिमूर या दोन्ही जागांवर विचार करावा अशी मागणी निरीक्षक पनकुले यांच्याकडे केली.

आणखी वाचा-नागपूर : चोरीच्या वाहनांची नोंदणी; दोन आरटीओ अधिकाऱ्यांसह तीन लिपिक…

विशेष म्हणजे जिल्ह्यातील एकही विधानसभा मतदारा संघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला नाही तर सर्व पदाधिकारी सामुहिक राजीनामा देतील असाही इशारा यावेळी देण्यात आला. काँग्रेस गेल्या ४० वर्षांपासून बल्लारपूर, चंद्रपूर आणि चिमूर विधानसभा मतदारसंघात लढत असून प्रत्येकवेळी पराभवाला सामोरे जावे लागले असल्याचा दावा कार्यकर्त्यांनी केला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी द्यावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यांना न्याय दिला जात नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. परिणामी, सर्व पदाधिकारी राजीनामा देतील, ज्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या निकालावर होईल.

दरम्यान, पक्षनिरीक्षक दिलीप पनकुले यांनी त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विदर्भप्रमुख अनिल देशमुख आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या विषयावर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यात येईल असे सांगितले.