नागपूर : इंदापूरचा ओबीसी मेळावा आटोपून जात असताना काही समाजकंटकांनी माझ्याबाबत चुकीचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र धनगर समाजाने या घटनेचा निषेध करताना शांततेचा मार्ग निवडावा, हिंसेचा मार्ग अवलंबू नये, असे आवाहन भाजपा नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे. पडळकर यांनी या संदर्भात नागपूर येथे एक निवेदन प्रसिद्धीस दिले आहे. त्यात पडळकर म्हणतात, ओबीसी समाज अत्यंत संयमाने शांततेत ओबीसी एल्गार मेळ्याव्यामध्ये आपल्या स्वतःच्या हक्काच्या आरक्षणाबाबत भूमिका मांडतोय. इंदापूरची सभा संपल्यानंतर शेतकऱ्यांना दुधाचे दर मिळाले पाहिजेत यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला भेट देण्यासाठी जात असताना काहींनी चप्पलफेक करून 'नौटंकी' केली आणि त्यांनीच पुन्हा माध्यमांना मुलाखती देत माझ्याच कार्यकर्त्यांनी हा प्रकार केल्याचे सांगितले. या खोटेपणाची मला कीव वाटते. मुळात आम्ही नेहमीच गरीब मराठा समाजला आरक्षण मिळालेच पाहिजे या भूमिकेचे आहोत. पण मराठा आरक्षणाच्या लढाईत शिरलेले काही समाजकंटक कधी कोणाची घरं जाळतात तर कधी कुणाला फोन करून शिव्या देतात. यावरून हेच स्पष्ट होते की समाजकंटकांचा हेतू आरक्षण मिळवणे नसून समाजात अशांतता पसरवणे आहे. हेही वाचा - नागपूर : शहरात देहव्यापार वाढला, दिल्ली-मुंबईच्या मॉडेल सेक्स रॅकेटमध्ये सक्रीय, तारांकीत हॉटेलमध्ये तरुणींचा मुक्काम हेही वाचा - दुर्गम भागातील डॉक्टरांना २३ वर्षांपासून पदोन्नती नाही, आरोग्य विभागातील सावळा गोंधळ यामागचा मुख्य सुत्रधार कोण आहे हे आम्हा सगळ्यांना माहितीये कारण तो स्वतःच्या मराठा समाजाच्या आरक्षणाचाही खरा शत्रू आहे. जर मी संयमाची भूमिका घेतली नसती तर या भेकडांच्या अंगावर कपडेही शिल्लक राहिले नसते. परंतु आज मी ओबीसी बांधवांना हेच आवाहन करतो आपण या घटनेचा निषेध हिंसेच्या मार्गाने करू नये. राज्यात शांतता ठेवावी. धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी येत्या ११ तारखेला आपल्याला नागपूर येथे सुरू असेल्या हिवाळी अधिवेशनावर इशारा मोर्चा काढायचा आहे. त्यासाठी आपण लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहून आपला रोष शांततेच्या मार्गाने व्यक्त करावा, असे पडळकर म्हणाले.