बुलढाणा : राज्यातील विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यावर असलेले राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे आज शुक्रवारी, ४ ऑक्टोबर रोजी बुलढाण्यात आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिय शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी, उद्योजक आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्याशी निगडित विविध समस्या, प्रकल्प, योजना आदी विषयांवर चर्चा केली.

शेतकऱ्यांच्या समस्या आणि आत्महत्या यावर पोटतिडकेने बोलत ते म्हणाले ,मी एक शेतकरी कुटुंबातील आहे. शेतकरी आत्महत्येबाबत राज्य शासन गांभीर्याने उपाययोजना करीत आहे. शेतकऱ्यांचे समुपदेशन केले जात आहे. त्यासाठी ‘मोबाईल क्लिनिक’ सुरु केले आहेत. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एकत्रितपणे काम करावे, अशा सूचना राज्यपाल राधाकृष्णन यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण बी- बियाणे उपलब्ध होण्यासाठी तपासणी, दर्जाबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना केंद्राकडून देण्यात आल्या असल्याचे राज्यपाल यावेळी म्हणाले.

हे ही वाचा…गडचिरोली : दक्षिण अबूझमाडमध्ये सात नक्षल्यांचा खात्मा, घटनास्थळी…

जिल्ह्यात रस्ते, दळणवळण व्यवस्था, पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर राज्य शासनाचा भर आहे. जिल्ह्यातील कृषी, सिंचन, औद्योगिक विकासाला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादनही राज्यपाल राधाकृष्णन यांनी केले.
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन म्हणाले, बुलढाणा जिल्ह्याचा औद्योगिकदृष्ट्या विकास करण्यासाठी जिल्ह्यात उद्योग वाढले पाहिजेत. जिल्ह्यात उद्योग प्रकल्प सुरु होणे गरजेचे असून त्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना राज्य शासनाला करणार आहे. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रात उद्योगासाठी जागा दिली जात आहे. स्थानिकांना उद्योग सुरु करण्याची संधी आहे. उद्योगातून जिल्ह्याचे सकल उत्पन्न वाढीस मदत होईल. तसेच मोठ्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होईल, असेही राज्यपालांनी सांगितले.

बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन, प्रशासन यांनी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज राज्यपाल राधाकृष्णन यांनी आज येथे अधोरेखित केली. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे मुळ कारण शोधून उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

हे ही वाचा…वर्धा: देवेंद्र फडणवीस म्हणतात, ’तेली समाज माझा पाठीराखा म्हणून मी पण…वर्धा: देवेंद्र फडणवीस म्हणतात, ’तेली समाज माझा पाठीराखा म्हणून मी पण…

सिंचन निधी, रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा

जीगाव सिंचन प्रकल्प हा जिल्ह्यातील सिंचन अनुशेष पूर्ण करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प टप्प्या टप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. पहिला टप्पा पूर्णत्वास येत आहे. जिल्ह्यातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी जीगाव, वैनगंगा- नळगंगा नदीजोड सिंचन प्रकल्पांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याच्या राज्य शासनाला सूचना देणार असल्याचेही ते म्हणाले. जिल्ह्यातील निर्यातदारांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल.

डॉक्टरांचा तुटवडा

बुलढाणा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतिम टप्प्यात आहे. राधाकृष्णन म्हणाले की गरजेच्या तुलनेत डॅाक्टर्सची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. त्यासाठी वैद्यकीय महाविद्यालय महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच जिल्हा रुग्णालयात दिव्यांगाना सर्व सुविधा देण्यासाठी विशेष केंद्र सुरु करण्यात आले असून त्याचा लाभ हजारो दिव्यांग बांधवांना होईल असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला. खेळाडूंसाठी जिल्हा नियोजन आराखड्यात निधीची तरतूद करावी अशी सूचना राज्यपालानी यावेळी केली.खामगांव- जालना रेल्वे मार्गासह शेगाव- पुणे रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल असे ठोस आश्वासन राज्यपाल राधाकृष्णन यांनी या चर्चेदरम्यान दिले.

यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण, आयुष (स्वतंत्र प्रभार) राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, आमदार संजय गायकवाड, आमदार श्वेता महाले, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात , पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, माजी मंत्री सुबोध सावजी, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, राहूल बोंद्रे, नानाभाऊ कोकरे, विविध राजकीय पक्ष व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते. बैठकीनंतर जिल्ह्यातील विविध घटकांशी चर्चा केल्यानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन पुढील नियोजित कार्यक्रमासाठी अकोलाकडे रवाना झाले.

हे ही वाचा…अमरावती : धक्कायदायक! वडिलांचा स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

लाडकी बहिण यशस्वी योजना

राज्य शासनाची माझी लाडकी बहीण योजना सर्वाधिक यशस्वी ठरल्याचे मत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी विविध घटकांशी संवाद साधतांना व्यक्त केले.