वर्धा : एकही दिवस सुट्टी न घेता लोकसेवेत कार्यरत असलेले असेही एक ग्रामदानी गाव वर्धा भेटीवर आले आहे. येथील गांधीवादी जाजू परिवारातर्फे तपोधन श्रीकृष्णदासजी जाजू स्मृती समारोहाचे आयोजन दरवर्षी केल्या जाते. या उपक्रमात देशात विविध ठिकाणी रचनात्मक आदर्श काम करणाऱ्यांचा परिचय करून दिल्या जातो. यावर्षी राजस्थान येथील उदयपूरलगत असलेल्या सीड या ग्रामदानी गावाचे कारभारी या उपक्रमात हजर झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गावतल्या जमिनीची मालकी ग्रामसभेची म्हणून हे गाव ग्रामदानी म्हणून गत ४० वर्षांपासून ओळखल्या जाते. या गावचे ‘अण्णा’ असलेले रामेश्वरप्रसाद पुरोहीत यांची वयाच्या १६ व्या वर्षी आचार्य विनोबा भावे यांच्याशी १९५९ मध्ये भेट झाली. त्यांच्या विचाराने भारावून रामेश्वरप्रसाद यांनी गावात सुधारणेचे कार्य सुरू केले. आज एक पूर्णपणे स्वावलंबी गाव म्हणून सर्वत्र सीडची ओळख झाली आहे. पूर्णत: व्यसनमुक्त, मांसाहारमुक्त, कोर्टकचेरीमुक्त, कर्जमुक्त असे हे गाव असल्याचे ग्रामपंचायत सदस्य मथुरालाल सांगतात.

हेही वाचा – भाजपबरोबर जाण्यात ठाकरे यांचा वेळकाढूपणा; अपात्रता सुनावणीत उदय सामंत, केसरकर यांचा दावा

गावातील प्रत्येक परिवाराकडे शेती आहे. जे भूमीहीन होते त्यांना ग्रामसभेने जमीन दिली. उत्पन्नाचा दहा टक्के हिस्सा ग्रामसभेला दिला जातो. ग्रामसभेत सर्व निर्णय होतात. एखादी व्यक्ती अनुपस्थित असल्यास ग्रामसभा होत नाही. परिसरातील जंगल, गावठान, नदी, नाले यावर गावाचीच मालकी. नामकरण करण्याचा अधिकार ग्रामसभेलाच आहे. घरावर कर आकारल्या जात नाही. शेतीसाठी पाणी वाटप ग्रामसभाच करते. एवढेच नव्हे तर गावातील वाद गावातच सोडविल्या जातो. न्यायालयात जाता येत नाही. गाव कारभाऱ्यांची निवडणूक होत नाही. सर्वसंमतीने तीन वर्षांसाठी मुखिया निवडला जातो. एकाच व्यक्तीला परत पद मिळत नाही. ग्रामसभेच्या याच प्रमुखाकडे सर्व महसुली दस्तावेज असतात.

न्यायदान करणाऱ्या ग्रामसभेच्या विरोधात कोणी न्यायालयास गेल्यास ताे खटला परत ग्रामसभेला पाठविल्या जातो. गावाची मालकी असलेल्या जंगलाचा अर्धा हिस्सा जळावू लाकडासाठी तर अर्धा गुरांच्या चाऱ्यासाठी ठेवला आहे. ग्रामसभेची परवाणगी न घेता झाडाची फांदी तोडणाऱ्या एका वनाधिकाऱ्यास गावाने दंड ठोठावल्याचे नमूद करीत रामेश्वरप्रसाद म्हणतात की, गावाच्या मालकीची एकही वस्तू कोणीच हिरावून घेवू शकत नाही. विना परवाणगी नदीतले मासे पकडणारा हा गावासाठी आरोपीच आहे. गावकऱ्यांनी दिलेल्या धान्यातून ग्रामकोष तयार होतो. त्यातून विकास कामांसोबतच गरजवंताला बिनव्याजी कर्ज देण्याचे काम होते. नवीन पिढीपण गावाचा हा संस्कार शिकून पुढे चालत असल्याचे रामेश्वरप्रसाद अभिमानाने सांगतात.

हेही वाचा – सरकारला दुष्काळाचे गांभीर्य नाही! पीक विमा धोरण शेतकऱ्यांना संकटात टाकणारे-विरोधकांची टीका

शिकण्याची संधी सर्वांनाच आहे. पण शिकला म्हणून गावाला विसरला असे एकही उदाहरण नाही. ग्रामसभेच्या कार्यालयाची ठरावीक वेळ नाही. जेव्हाही गरज पडेल तेव्हा दस्तावेज उपलब्ध करून दिल्या जाताे. रविवार किंवा अन्य सुट्टी हा प्रकारच नाही. गोमाता हीच गावाची देवता. तिचा सर्वांवर नैतिक धाक. ग्रामसभेची परवाणगी घेतल्याशिवाय पोलिसांना गावात प्रवेश मिळत नाही. वारसाहक्कांचे निर्णय ग्रामसभाच घेत असल्याने वाद नाही.

सामाजिक असमानता व आर्थिक असमानता दूर करण्याचा मुख्य हेतू असतो. या गावाची अभिनव व्यवस्था पाहण्यासाठी देशातीलच नव्हे तर विदेशातूनही अनेकांची पावले या सीड गावाकडे वळली आहे. बेरोजगारीला समर्थ उत्तर देण्याचा हा एक आदर्श असल्याचे डॉ. उल्हास जाजू म्हणाले. प्रत्यक्ष गावाला भेट दिल्यानंतर या व्यवस्थेची महती कळत असल्याचे ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gramdani village working in public service came to visit wardha tapodhan shree krushnadasji jaju memorial ceremony organized pmd 64 ssb
Show comments