अकोला :  शहरातून वाहणाऱ्या मोर्णा, विद्रूपा नदी काठी अन्यायकारक पद्धतीने आखण्यात आलेल्या निळ्या व लाल पूरनियंत्रण रेषेला स्थगिती देण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. पाटबंधारे विभागाने चुकीच्या पद्धतीने रेषा आखल्याचा मुद्दा आमदार रणधीर सावरकर व आमदार वसंत खंडेलवाल यांनी निदर्शनात आणून दिला. त्यावर पालकमंत्र्यांनी नव्याने पूररेषा आखण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाला केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> सशक्त युवापिढीसाठी ‘नशामुक्त पहाट’, यवतमाळ पोलिसांचा उपक्रम

अकोला शहरातून वाहणाऱ्या मोर्णा, विद्रूपा नदी काठी नव्याने आखण्यात आलेली पूरनियंत्रण रेषा अन्यायकारक असून, यामुळे लाखो अकोलेकरांचे प्रचंड नुकसान होत आहे. शहरविकास बाधित होणार होता. सामान्य नागरिक, शेतकरी, भूखंड विकासक, बांधकाम व्यावसायिक अडचणीत येणार असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे नॅशनल रियल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल (नरेडको ) आर्किटेक्ट असोसिएशन आणि सिव्हिल इंजिनिअर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार रणधीर सावरकर यांची भेट घेतली. यावेळी माजी महापौर विजय अग्रवाल, भाजप महागराध्यक्ष जयंत मसने यांच्या समक्ष , नरेडकोचे अध्यक्ष सुनिल ईंन्नाणी, सचिव दिलीप चौधरी, उपाध्यक्ष अविनाश राऊत, आर्किटेक्ट असोसिएशनचे ईश्वर आनंदानी, सिव्हिल इंजिनिअर असोसिएशनचे अनुराग अग्रवाल उपस्थित होते. याची तातडीने दखल घेऊन आ. सावरकर यांनी पालकमंत्र्यांसमोर पाटबंधारे विभागाकडून कसा अन्याय होते हे मुद्देसूद स्पष्ट केले. जुनी पूरनियंत्रण रेषा पुरसंरक्षण योजना अंमलात आल्यानंतर कमी व्हायला हवी होती. मात्र, शहर विकास आराखड्यात ती तशीच कायम राहिली. आता नव्याने आखण्यात आलेली पूरनियंत्रण रेषा अन्यायकारक असून, ती रद्द करण्यात यावी, लोकसुनावणी घेऊन रेषा आखावी, नदीचे खोलीकरण करून पूरसंरक्षकभिंत बांधण्याची मागणी आज आमदार रणधीर सावरकर यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लावून धरली.

हेही वाचा >>> नुकसानीमुळे नागपूरकर हताश आणि ‘विकास पुरुष’ गडकरी !

चुकीच्या पद्धतीने निळी व लाल रेषा आखली आहे. याचे दूरगामी गंभीर परिणाम शहरवासीयांना भोगावे लागणार आहेत. दोन्ही नदी काठालगतच्या भागात मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती निर्माण झाली असून, भविष्यातही याच भागात मोठया प्रमाणात नागरिकांची निवासी बांधकामे प्रस्तावित आहेत. नदीकाठावरील भागात आतापर्यंत झालेल्या बांधकामांना या निळ्या व लाल रेषेमुळे बाधा पोहचली आहे. नागरिकांचा प्रचंड रोष वाढत चालला असल्याचे आ. सावरकर यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.  सुमारे एक लाख सामान्य नागरिकांना याचा फटका बसला असल्याचे  लक्षात आणून दिले. पूररेषा सुधारित न केल्यास असंख्य लोकांची शेकडो कोटींची मालमत्ता, व्यवहार अडचणीत येतील. भविष्यात बांधकाम व्यावसायिक, इंजिनिअर्स, आर्किटेक्ट, बँकांना यामुळे मोठे नुकसान सोसावे लागू शकते  त्यामुळे चुकीच्या पद्धतीने आखण्यात आलेली निळी, लाल रेषा रद्द करून नव्याने आखणी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्याची तातडीने दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला. मात्र, याबाबत संबंधित अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे आपण तात्काळ प्रभावाने सदरच्या पूरनियंत्रण रेषेला स्थगिती देत असल्याचे पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guardian minister radhakrishna vikhe patil suspended flood control line of merna vidrupa river ppd 88 zws
Show comments