नागपूर : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत गेल्या तीन आठवडय़ांपासून सरासरीपेक्षा अधिक तापमान आहे. कोकणातही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावा, अशा सूचना हवामान अभ्यासकांनी केल्या आहेत.  यंदाचा उन्हाळा अधिक तीव्र असून दरवर्षी ही तीव्रता वाढत जाणार आहे. यंदा दुसऱ्यांदा कोकण किनारपट्टीलगत उष्णतेचे प्रमाण तीव्र झाल्याचे आढळले.

विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटांचे अनेक इशारे दिले जात आहेत. पारा सरासरी पातळीपेक्षा वर गेला असून सार्वजनिक आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणारी ही स्थिती आहे. जळगाव शहरात १२ मे रोजी उच्चांकी कमाल ४४.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ विदर्भातील अकोला शहरानेदेखील ४४.५ अंश सेल्सिअससह उच्चांक नोंदवला. मराठवाडय़ात परभणी ४३.६, तर मुंबई व कोकण विभागात मुंबईने ३५.२ अंश सेल्सिअसची नोंद केली.

वाढत्या उष्णतेच्या लाटा आणि त्यांचा सामना करण्यासाठी एक धोरण आवश्यक आहे.

– माधवन नायर राजीवन, माजी केंद्रीय सचिव

उष्णतेच्या लाटांना हाताळण्याचे नियोजन करणे आणि उन्हाळय़ात ते तातडीने राबवणे गरजेचे आहे.

– आदित्य पिल्लई, सहयोगी सहकारी, सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च.

Story img Loader