नागपूर : विदर्भात उन्हाचा चटका तापदायक ठरत असतानाच उपराजधानीत मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह अचानक पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली.

‘ऑक्टोबर हीट’ वाढल्याने विदर्भात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने ३५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. अशा स्थितीत भारतीय हवामान खात्याने आज महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात तसेच विदर्भात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. शनिवारपासून मोसमी पावसाने राज्यातील नंदूरबार जिल्ह्यातून परतीच्या पावसाचा प्रवास सुरु केला. मात्र, त्यानंतर त्यात फारशी प्रगती दिसून आली नाही. दरम्यान, आता पुन्हा राज्यातील काही भागातून मोसमी पावसाच्या परतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे. केरळ आणि परिसरावरील चक्राकार वारे तसेच बंगालच्या उपसागरापासून लक्षद्वीप बेटापर्यंत असलेली चक्राकार वाऱ्याची स्थिती यामुळे अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. दरम्यान विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढत आहे. सोमवारी अकोल्यात ३७.८ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. तर ब्रम्हपूरी येथे ३६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. उर्वरित जिल्ह्यात देखील कमाल तापमान ३४, ३५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आहे.

हेही वाचा – सावधान! ‘समृद्धी’वर दगडफेक, चालकामुळे टळली भीषण दुर्घटना

हेही वाचा – बुलढाण्यात यश मिळविण्यासाठी ठाकरे गट सक्रिय

मंगळवारी सकाळी उपराजधानीत उन्ह होते. पावसाचे वातावरण नसतानाच दुपारी १२.३० ते एक वाजताच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी झाली आणि दुपारी एक वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली. ढगांचा प्रचंड गडगडाट होता, तर त्याचवेळी वीजा देखील कडाडत होत्या. अचानक सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. आडोसा घेण्याची संधीही पावसाने दिली नाही. शहरातील काही भागातच ही स्थिती होती. काही भागात पाऊस नव्हता, पण वादळी वारे आणि ढगांचा गडगडाट होता. तर काही ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. अंबाझरी परिसरात मुसळधार पाऊस तर वर्धा रोड परिसरात मात्र पावसाचा एकही थेंब नव्हता. मात्र, सुमारे तासभर कोसळलेल्या पावसामुळे रस्ते ओलेचिंब आणि झाडांचा कचराही मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पडला होता. अवघ्या तासभराच्या पावसाने वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला. दरम्यान, तासभराच्या पावसामुळे वातावरणात बऱ्याच प्रमाणात गारवा निर्माण झाला. नागपूरसह चंद्रपूर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.