लोकसत्ता टीम
नागपूर: मान्सूनने वेळेआधीच संपूर्ण देश व्यापला असताना गेले चार-पाच दिवस विश्रांती घेतली होती. मात्र, मंगळवारपासून पुन्हा एकदा तो सक्रीय झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मुंबई, महाराष्ट्रासह सध्या देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. राज्यातील विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस चांगलाच बरसला. दरम्यान गेली चार-पाच दिवस पावसाने विश्रांती घेतली. काही ठिकाणी पावसाचा जोर कमी झाला तरीही हलक्या सरींनी शहराला ओलंचिंब केले. भारतीय हवामान खात्याने येणारे दोनही दिवस पावसाचेच असल्याचे सांगितले आहे.
पाच आणि सहा जुलै दरम्यान राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. सहा जुलैपर्यंत मान्सूनची तीव्रता वाढणार असून हा तीव्र कमी दाबाचा पट्टा कोकणाच्या उत्तर दिशेने सरकणार आहे. तर, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये मध्यम स्वरुपाच्या पर्जन्यमानाचा अंदाज आहे.