वर्धा : जिल्ह्यात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. तसेच झाल्याने ग्रामीण भागाची दैना उडाली असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी सकाळी पाच तास वृष्टी झाली. त्यानंतर रात्रीपासून सूरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. सार्वत्रिक संतातधार असल्याने सर्वच तालुक्यात जनजीवन ठप्प झाले आहे.

रात्री पासून झड म्हणून विविध धरणे तुडुंब भरण्याच्या मार्गावर आहेत. पोथरा धरण ८५ टक्के भरले असून आज १०० टक्के भरण्याची शक्यता गृहीत धरून नदीकाठच्या गावांना सतर्क करण्यात आले आहे. लाल नाला प्रकल्पच्या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस बरसला. म्हणून जालशय पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी या प्रकल्पचे पाच दरवाजे उघडण्यात आले. पाच घनमीटर प्रती सेकंद विसर्ग सूरू झाल्याने पोथरा व वर्धा नदी काठच्या गावकऱ्यांना सावधान करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. काही धरण क्षेत्रात ११२ मि मि. पावसाची नोंद झाल्याने परिस्थिती गंभीर झाल्याचे म्हटल्या जाते.नांद प्रकल्पच्या क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने सात दरवाजे आज उघडण्यात आले. नदी पात्र नं ओलांडण्याचा ईशारा देण्यात आला आहे. टाकली बोरखेडी, पंचधारा, शिरुड, डोंगरगाव, बोर, निम्न वर्धा, कार हे प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत.सेलू तालुक्यातील वडगाव, रेहकी, सुरगाव, कान्हापूर, महाबला, कोटंबा, इंदापूर, बेलगाव, सुकळी, वाहिदपूर, दौलतपूर, मोर्चापूर, गोंदापूर, जयपूर, चारमंडळ, गायमुख, चिंचोली, महागाव, पिंपळगाव, पाहिलापूर व अन्य गावातील पिके भरडून निघाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. सेलू शहर तर कालच्या प्रमाणे आजही तलाव झाल्याचे चित्र आहे.

हेही वाचा : “गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांना केवळ उद्योगासाठी वेळ, जनता वाऱ्यावर ?”, काँग्रेसची टीका

एकूण ५६६ मि मि ची पर्जन्य नोंद आहे. हिंगणघाट तालुक्यात सावली, वाघोली, वडनेर, अल्लीपूर, सिरसगाव, पोहना व कानगाव ही मंडळे अतिवृष्टीने धुवून निघाली आहे. हिंगणघाट ते उमरी, वॉलधुर – पिंपळगाव, भोसा -सिंदी, कुंभी सतेफळ, मांडगाव – पेठ व अन्य ग्रामीण रस्ते आज बंद पडले आहेत. हिंगणघाट तालुक्यातील मानोरा ते काजलसरा रस्त्यावरील पुलास अतिवृष्टीने भगदाड पडले आहे. सतर्कता बांधकाम विभागास याबाबत हालचाल करण्याची सूचना झाली आहे. तालुक्यातील लेंढी नाल्या पलीकडे पेठ येथे ७०० घरांची वस्ती आहे. येथील पूल पाण्याखाली गेल्याने लोकांची कोंडी झाली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी अतिवृष्टीने पूर्वजन्य स्थिती काही भागात झाली. पण सर्व नियंत्रणात असल्याचे स्पष्ट करीत आपण वारंवार आढावा घेत असल्याचे नमूद केले. सेलू शहरास बसलेला पाण्याचा विळखा आज परत मुसळधार झाल्याने घट्ट झाला. काही शासकीय कार्यालये पण पाण्याखाली गेल्याने सर्व ठप्प पडले.

हेही वाचा : Bhandara updates: वीज कोसळून महिला मजूर ठार, शेतात रोवणी करताना…

सेलू आढावा बैठकीत त्वरित पंचनामे करण्याची गरज व्यक्त झाल्यावर त्यासाठी शासनाचे निर्देश आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तेव्हा आमदार डॉ. पंकज भोयर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क करीत पंचनामे निर्देश देण्याची विनंती केली. त्यांना तात्काळ होकार दिल्याचे आ. भोयर यांनी ‘लोकसत्ता’स सांगितले.