लोकसत्ता टीम

वर्धा: वर्ध्यात शेतकरी मदत निधी म्हणून बँक आहे. या बँकेचे प्रकरण सध्या चांगलेच गाजू लागले आहे. बँकेच्या वर्धेसह सेलू, आर्वी, कारंजा, मोर्शी, वरुड व तिवसा येथे शाखा आहेत. बँकेचे अध्यक्ष शरद अरुण कांबळे हे असून संचालक म्हणून प्रियंका कांबळे, प्रशांत फुलझेले व अन्य आहेत. त्यांच्या विरोधात शेकडो खातेदारांनी फसवणूक केल्याचा आरोप करीत जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. मुदत ठेव, नियमित ठेवी व अन्य स्वरूपात या बँकेत ठेवलेले पैसे परत मिळावे म्हणून खातेदारांनी तगादा लावला.

१५ फेब्रुवारी पासून बँकेचे व्यवहार ठप्प पडले आहेत. पैसे परत मिळत नसल्याने लोकं अडचणीत आले. शेवटी प्रशासन व पोलीस यांच्या मध्यस्थीने एक तोडगा निघाला होता. त्यानुसार अध्यक्ष कांबळे यांनी ५०० रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर हमी दिली. त्यात ठराविक कालावधीतील सर्व ग्राहकांचे पैसे ४५ दिवसात परत देण्याची हमी देण्यात आली होती. मात्र तसे झाले नाही. आज ही मुदत पूर्ण झाली. मात्र बँकेने पैसे परत करण्याची हालचाल न केल्याने या सर्व खातेदार ग्राहकांनी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्याकडे धाव घेतली. शेकडो खातेदार रेस्ट हाऊस वर जमा झाले. संकटाची जाणीव आमदार भोयर यांना करुन देण्यात आली. तेव्हा भोयर हे खातेदारांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले.

आणखी वाचा-विदर्भातील शाळा १ जुलैपासून सुरू होणार, शिक्षण उपसंचालकांनी शिक्षकांना दिल्या या सूचना

प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांना हा प्रकार सांगण्यात आला. तेव्हा पोलीस तक्रार करण्याची सूचना झाली. मात्र ते खातेदारांनी फेटाळून लावली. कारण पोलीस तक्रार, न्यायालय, चौकशी यात पैसे लटकून पडण्याची खातेदारांची सुप्त भीती आहे. त्यामुळे शासनाने बँकेची मालमत्ता जप्त करावी व पैसे परत करण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी भूमिका मांडण्यात आली. शेवटी यासाठी एक समिती गठीत करण्याचे प्रशासनाने मान्य केले आहे. बँकेचे सात हजारावर ग्राहक आहे. त्यांना न्याय केव्हा मिळणार, असा प्रश्न एका निवेदनातून करण्यात आला आहे.अध्यक्ष शरद कांबळे यास अटक नं करता त्याची मालमत्ता जप्त करावी. स्वतः त्यानेच अशी हमी दिली होती. त्याला आता मुदतवाढ देवू नये, असे खातेदारांनी नमूद केले.

आणखी वाचा-भाजप नेत्याचा ओबीसी आरक्षणाला जाहीर पाठिंबा…राज्य सरकारला इशारा देत म्हणाले….

आमदार भोयर म्हणाले की अध्यक्ष व इतरांची मालमत्ता जप्त करण्याची सूचना केली आहे. पोलीस तक्रार देण्यास खातेदार तयार नाहीत. परिणामी आता शासन काय करणार ते बघावे लागेल. आता खातेदारांचा जीव टांगणीस लागल्याचे चित्र दिसून येते. या बँकेत वर्धा शाखा – ७ कोटी ७५ लाख रुपये, सेलू – ७ कोटी २५ लाख, तिवसा – २ कोटी १० लाख, आर्वी – ६ ती १० लाख, कारंजा – २ कोटी ३० लाख, मोर्शी – ३० लाख, वरुड – १ कोटी ३० लाख असे एकूण २८ कोटी ४० लाख रुपये खातेदार ग्राहकांचे अडकून पडले आहेत.