लोकसत्ता टीम

वर्धा : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आणि प्रशासनात एकच लगबग सुरू झाली. कार्यक्रमानुसार २२ ऑक्टोबर २०२४ ला निवडणूकीची अधिसूचना प्रसिद्ध होणार. मतदान २० नोव्हेंबर बुधवारला तर मतमोजणी २३ नोव्हेंबर शनिवारला होणार आहे. निवडणूक हा लोकशाहीचा उत्सव असून त्यात सर्व मतदारांचा सहभाग आवश्यक असल्याचे निवडणूक आयोगाने आज स्पष्ट केले.

गत काही दिवसापासून महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका कधी होणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर तारीख जाहीर झाली आणि प्रशासन ५ वाजेपासून कामाला लागले. प्रमुख अधिकाऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. यात पहिले २४, ४८ व ७२ तास सर्वात महत्त्वाचे ठरले आहे. निवडणूकविषयक कामाच्या दृष्टीने हे आजपासून पहिले तीन दिवस महत्त्वाचे ठरतात. पहिल्या २४ तासात शासकीय कार्यालयात लागलेले विविध बॅनर्स, पोस्टर्स, माहितीफलक काढणे अनिवार्य आहे.

आणखी वाचा-बच्‍चू कडू मुख्‍यमंत्र्यांच्‍या भेटीला; समजूत काढण्‍याचा प्रयत्‍न?

पुढील २४ तासात सार्वजनीक इमारतीवर लागलेले राजकीय बँनर्स व तत्सम साहित्य काढल्या जाणार. त्या पुढील २४ तासात म्हणजेच ७२ तासात खाजगी इमारतीवरील राजकीय साहित्य हटविण्याची मूदत आहे. काही ठिकाणी बॅनर्स काढल्या जातात. तर कोनशिला वगैरे सारखे राजकीय साहित्य झाकल्या जातात. खाजगी घरांवरीलही राजकीय प्रसिद्धी स्वरूपातील साहित्य हटविण्याची सूचना आहे. मात्र जी घरे दर्शनी भागात आहे, अश्याच घरांवरील साहित्य प्रामुख्याने हटविल्या जाते. त्या दृष्टीने आढावा घेण्यात आला. यावेळी मतदानकेंद्र पण वाढली आहे.

आणखी वाचा-तुमच्या मुलाला इंग्रजी शाळेत प्रवेश घ्यायचा आहे, बघा नामवंत शाळांचे शुल्क किती आहे?

मतदार हे हेल्पलाईनच्या माध्यमातून आपल्या मतदानकेंद्रासह इतर माहिती मिळवू शकतात. महाराष्ट्रात एकूण ९ कोटी ६३ लाख मतदार आहेत. विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी २३४ सर्वसाधारण मतदारसंघ तर २५ मतदारसंघ अनुसूचीत जमातीसाठी व २९ मतदारसंघ अनुसूचीत जातींसाठी राखीव आहे. निवडणूक काळात पैश्याचा गैरवापर होवू नये म्हणून विविध ठिकाणी पथके तयार करीत तपासणी केल्या जाणार आहे. ज्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्यांना त्याबाबत तीनदा वृत्तपत्रातून माहिती देण्याचे बंधनकारक आहे.

इलेक्ट्रॉनिक्स मतदानयंत्राची प्रथमस्तरीय तपासणी आटोपली आहे. आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भरारीपथक कार्यरत झाले आहे. निवडणूकीत इनकोअर, सुविधा ॲप, सक्षम उमेदवार, सीव्हीजील, इएसएमएस हे मोबाईल ॲप मतदारांच्या सुविधेसाठी उपलब्ध आहे. मतदारांच्या सुविधेसाठी जिल्ह्यात मतदार सहायता केंद्राची स्थापना करण्यात आली असून १९५० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.