लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला : ‘मविआ’मध्ये घटक पक्ष आहोत की निमंत्रित यावरून आम्हीच संभ्रमात आहोत. महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होण्याचे आमचे शेवटपर्यंत प्रयत्न राहणार आहेत. ‘मविआ’सोबत आघाडी न झाल्यास महाराष्ट्रात वंचित विरूद्ध भाजप अशीच लढत होईल, असा दावा ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केला. अकोल्यात रविवारी पत्रकार परिषदेत त्यांनी ‘मविआ’च्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली.

ते म्हणाले, ‘वंचितने महाविकास आघाडीला चार प्रमुख मुद्द्यांचा प्रस्ताव सादर केला. यामध्ये सध्याची परिस्थिती लक्षात घेता किमान १५ ओबीसी उमेदवार असायला हवेत. धार्मिक अल्पसंख्याक समाजातून किमान तीन उमेदवार द्यावे. ‘मविआ’तील प्रत्येक घटक पक्षाकडून लेखी वचन घ्यावे की, त्यांचा पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणुकीपूर्वी किंवा निवडणुकीनंतर भाजपमध्ये सामील होणार नाही. धर्मनिरपेक्ष मतदारांना आश्वासित करण्यासाठी काही घटक पक्षांचा इतिहास लक्षात घेता ते आवश्यक आहे. शक्य असेल तर घटक पक्षांनी युतीच्या वेळी त्यांच्या मसुदा द्यावा. वंचित आघाडीने कुठलीही अट ठेवलेली नाही. मविआ आता काय भूमिका घेता याकडे आता आम्ही वाट पाहत आहोत.’

आणखी वाचा-video: ‘गण गण गणात बोते’चा गजर अमेरिकेतही, डग्लस येथे गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात

काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेमध्ये १५ जागांवरून, तर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये नऊ जागांवरून वाद असल्याची माहिती मिळत आहे. त्यांचे आपसात ६ तारखेपर्यंत ठरत असेल तर स्वागतार्ह आहे. ‘मविआ’ आणि वंचित आघाडी एकत्रित लढण्यास किमान ४० जागा निवडून येतील. वंचित आघाडी स्वतंत्र लढली तर किमान सहा जागा निवडून येतील. एकूण परिस्थिती बघितल्यास वंचित व भाजपमध्येच लढत होईल, असे ते म्हणाले. पत्रकार परिषदेला वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

६ मार्चला शरद पवारांसोबत चर्चा

मविआ संदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी ६ मार्चला चर्चा करण्यासाठी बोलावले आहे. ही चर्चा नेमकी कुठे होणार, याचे स्थळ निश्चित झालेले नाही. शरद पवार यांच्याशी चर्चासाठी जाणार असल्याचे ॲड. आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-कुमार विश्वास म्हणतात, “महाराष्ट्रात कोण कोणत्या पक्षात हे कळायला मार्ग नाही”

भाजप १५० जागाही पार करू शकणार नाही

भाजपकडून ‘अबकी बार ४०० पार’ चा नारा देण्यात येत असला तरी यावेळेस ते १५० जागाही पार करू शकणार नाही, असा अंदाज ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला. बिहार, उत्तर प्रदेशमध्ये प्रचाराला गेला नाही, तरीही तेथील १० टक्के मतदान फिरवू शकतो, असे देखील ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: If there is no alliance with mavia there will be a bjp vs vanchit fight in maharashtra says prakash ambedkar ppd 88 mrj
Show comments