अकोला : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून खोटा प्रचार करण्यात आला. भाजप सत्तेत आल्यास संविधान बदलण्याविषय गैरसमज पसरवण्यात आले, असा आरोप माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा खासदार डॉ. भागवत कराड यांनी आज येथे केला. संविधान कोणीही बदलू शकत नाही, असा दावादेखील त्यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला लोकसभा मतदारसंघातील आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, आमदार वसंत खंडेलवाल, माजी महापौर विजय अग्रवाल, जिल्हाध्यक्ष किशोर मांगटे, महानगराध्यक्ष जयंत मसने, प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी आदी उपस्थित होते. भाजपकडून राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये आढावा घेतला जात आहे. निवडणुकीतील कामगिरीवर चिंतन करण्यात येत आहे. कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली. त्याचा अहवाल प्रदेश कार्यालयाकडे सादर करणार असल्याचे डॉ. कराड यांनी सांगितले.

हेही वाचा : ‘हिट अँड रन’ मध्ये जखमी ‘त्या’ चिमुकलीचाही मृत्यू

गेल्या १० वर्षांत देशाचा झपाट्याने विकास झाला. सर्वच क्षेत्रात देशाने प्रगती केली. जर्मनी, जपानला मागे टाकून देशाची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या स्थानावर आणण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न आहेत. ते आगामी काळात त्यामध्ये निश्चित यशस्वी होतील, असा विश्वास डॉ. कराड यांनी व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने खोटा प्रचार केला. भाजप पूर्ण बहुमतात सत्तेत आल्यास संविधान बदलतील, असा गैरसमज मतदारांमध्ये काँग्रेसने पसरवला. काही नागरिकांमध्ये तसा समज देखील झाला होता. खोटारड्या प्रचाराला ते बळी पडले. २०१४ मध्ये मोदींनी संविधानाला वंदन करून शपथ घेतली होती. यावेळेस देखील त्यांनी संविधानाला साक्षी ठेऊन पदभार स्वीकारला. संविधान कोणीही बदलणार नाही, असे डॉ. कराड यांनी सांगितले.

हेही वाचा : ईव्हीएमबाबत शंका निरसन करण्याचा सर्वांना अधिकार – बावनकुळे

काँग्रेसने प्रचारात प्रचंड खोटी आश्वासने देऊन मतदारांची दिशाभूल केली. प्रत्येक महिलांच्या खात्यात ८,५०० रुपये जमा करण्याचे आमिष दाखवले. काँग्रेसने ‘गरिबी हटाव’चा नारा दिला होता, मात्र त्यांच्या कार्यकाळात कधीही गरिबी हटली नाही, अशी टीकादेखील डॉ. कराड यांनी केली. भाजपने संपूर्ण अभ्यास करून जाहीरनामा तयार केला होता. त्या जाहिरनाम्यातील आश्वासने पाळली जाणार आहेत. आगामी काळात देशात उज्ज्वल काळ येणार आहे, असा दावाही कराड यांनी केला.

हेही वाचा : आनंदाची बातमी! तब्बल दोन आठवड्यानंतर मोसमी पाऊस पुढे सरकला…

आगामी निवडणुकांसाठी तयार रहा

आगामी विधानसभा, महापालिका, नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या संपर्कात रहा. निवडणुकांच्या दृष्टीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन कराड यांनी केले. आढावा बैठकीत त्यांनी १६५ पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola bjp mp bhagwat karad said false campaign by congress to win lok sabha elections ppd 88 css
Show comments