अकोला : विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसची आठ मते फुटल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या मुद्यावर वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला पुन्हा एकदा डिवचले आहे. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांची मते भाजपला गेल्याने काँग्रेस म्हणजेच भाजप असल्याचे सिद्ध झाले, अशी टीका वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात विधान परिषदेचे १२ सदस्य निवडण्यासाठी निवडणूक झाली. १२ जागांसाठी १३ उमेदवार रिंगणात असल्याने निवडणूक अटळ होती. या निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी कुणाला फटका बसणार यावरून वेगवेगळे अंदाज वर्तवल्या जात होते. महायुतीमधील भाजपचे पाच, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीतील अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे ४२ आमदार असतांना पक्षाच्या उमेदवारांना त्याहून अधिक मते मिळाली. यामुळेच भाजप आणि अजित पवार गटाला महाविकास आघाडी किंवा अन्य पक्षांची मते मिळाल्याचे स्पष्ट होते. काँग्रेसची आठ मते फुटल्याचा अंदाज असून त्यावरून टीका-टिप्पणी होऊ लागली आहे. या प्रकरणावरून वंचित आघाडीने काँग्रेसला घेरले.

हेही वाचा : आज रात्री मुसळधार ते अतिमुसळधार…वाचा तुमच्या शहरात कशी असेल स्थिती?

वंचित आघाडीवर भाजपची ‘बी टीम’ असल्याचा नेहमीच आरोप होतो. त्यावर वंचित आघाडी पलटवार करून काँग्रेसच भाजपची ‘बी टीम’ असल्याचे म्हणते. विधान परिषद निवडणुकीतील मतांच्या फाटाफुटीवरून वंचितने काँग्रेससह टीकाकार विचारवंतांवरदेखील शरसंधान साधले. काँग्रेसला एस, एसटीचे समर्थक, पुरोगामी, संविधानवादी, धर्मनिरपेक्ष आणि भाजपविरोधी म्हणणारे तथाकथित काँग्रेसी विचारवंत आता कुठे आहेत, असा सवाल डॉ. पुंडकर यांनी केला. काँग्रेसची आठ मते कसे काय फुटले, यावर त्या विचारवंतांनी समाजाला विश्लेषण करून द्यायला पाहिजे, असेदेखील ते म्हणाले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अकोला मतदारसंघात काँग्रेसच्याच लोकांनी भाजपला मदत केली. वंचित शोषितांच्या चळवळीला पराभूत केले आहे. काँग्रेस म्हणजेच भाजप असून त्यांनी समाजाचा घात केला, असा आरोपदेखील डॉ. पुंडकर यांनी केला.

हेही वाचा : फुटलेल्‍या आमदारांमध्ये सुलभा खोडके यांच्या नावाची चर्चा…त्या म्हणाल्या, “स्थानिक राजकारण…”

शिंदे सेनेचे ठाकरे गटाला मतदान

शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला मतदान केले. मिलिंद नार्वेकर यांना निवडून आणण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी देखील मदत केली आणि शेकापच्या जयंत पाटील यांना पराभूत केले, असा आरोप डॉ. पुंडकर यांनी केला. महाराष्ट्रातील राजकारणात कोण कुणाला मदत करीत आहे, हे विधान परिषद निवडणुकीवरून स्पष्ट झाल्याचे देखील ते म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akola vanchit bahujan aghadi s dr dhairyavardhan pundkar says congress is bjp ppd 88 css