अमरावती : आम्‍ही तिसरी आघाडी स्‍थापन करणार नाही, तर आमची आघाडी ही शेतकरी, कष्‍टकऱ्यांची आहे. येत्‍या १९ जुलैला मी सरकारकडे आमच्‍या मागण्‍यांचे निवेदन सादर करणार आहे. सरकारने सर्व मागण्‍या मान्‍य केल्‍या, तर माझी अचलपूर मतदार संघाची जागा महायुतीला देऊ, मी विधानसभेची निवडणूक लढविणार नाही, असे प्रहार जनशक्‍ती पक्षाचे आमदार बच्‍चू कडू यांनी प्रसार माध्‍यमांशी बोलताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पेरणी ते कापणीपर्यंत सर्व कामे रोजगार हमीमधून करण्यात यावीत. ५० टक्क्यांच्या नफ्यासह शेतकऱ्यांच्‍या शेतमालाला भाव द्यावा. दिव्यांगांना ६ हजार रुपयांची आर्थिक मदत अशा १८ मागण्या आम्‍ही सरकारकडे मांडणार आहोत. सरकारने आमच्‍या मागण्‍या मान्‍य केल्‍यास निवडणूक कशासाठी लढायची, असे बच्‍चू कडू यांनी स्‍पष्‍ट करतानाच मी महायुतीत आहे, असे तुम्‍हाला कुणी सांगितले, असा प्रतिप्रश्‍न त्‍यांनी पत्रकारांना विचारला.

हेही वाचा : अकोला: महिला सरपंचाला शिवीगाळ, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर ॲट्राॅसिटी; राजकीय दबावातून गुन्हा दाखल केल्याचा…

मी महायुतीमध्ये नाही. मी मागण्‍यांचे निवेदन सरकारला देणार आहे. मागण्या मान्य झाल्या तर निवडणूक लढण्याची काय गरज आहे. आमची तिसरी आघाडी नसेल, तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी यांची आघाडी करणार आहोत. आमची आघाडी पहिली असेल. बाकीच्या सगळ्या आघाड्या नंतर येतील, असे कडू म्हणाले. बच्‍चू कडू यांनी यापुर्वी अनेकवेळा सरकारच्‍या धोरणांवर कठोर शब्‍दात टीका केली आहे. आपली प्राथमिकता ही शेतकरी, शेतमजूर, दिव्‍यांग, कष्‍टकरी यांच्‍या विषयांसोबत आहे, असे ते म्‍हणाले. जिल्‍हाधिकारी, शासकीय अधिकारी यांच्‍या मुलांना दर्जेदार शिक्षणाची सुविधा उपलब्‍ध असते, पण शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्‍या मुलासमोर मात्र अडचणींचा डोंगर उभा राहतो, हे बदलले पाहिजे, असे बच्‍चू कडू म्‍हणाले.

राज्‍यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्‍ये जागावाटपाच्‍या दृष्‍टीने चाचपणी सुरू झाली आहे. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाल्‍याने आघाडीचा आत्‍मविश्‍वास वाढलेला असताना दुसरीकडे, महायुती सरकारनेही लोकप्रिय घोषणांच्‍या माध्‍यमातून जनाधार मिळवण्‍यासाठी धडपड सुरू केली आहे. आता आमदार बच्‍चू कडू हे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : ‘‘काँग्रेस म्हणजेच भाजप”, वंचितने मतफुटीवरून डिवचले; लोकसभा निवडणुकीतही…

स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार संभाजीराजे, प्रहार संघटनेचे आमदार कडू आणि स्वाभिमानी संघटनेचे तुपकर यांच्यात काही दिवसांपुर्वी पुण्यात बैठक झाली. या बैठकीत वेगळी आघाडी स्थापन करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत ठराविक जागा स्‍वतंत्र आघाडीच्‍या वतीने लढविल्‍या जातील, असे संकेत बच्‍चू कडू यांनी दिले आहेत. महायुती आणि महाआघाडीमध्ये अनेक छोटे पक्ष आहेत; पण त्यांना महत्त्व मिळत नसल्यामुळे ते नाराज आहेत. अशावेळी त्यातील नाराज पक्षांना आपल्या सोबत घेण्याचा या आघाडीतील नेत्यांचा प्रयत्न असल्याचे सांगण्‍यात येते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati bachchu kadu will not contest assembly election if state government fulfill his demands mma 73 css
Show comments