अकोला : शासकीय कामांमध्ये लाचेची मागणी होण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. शासकीय कामांना लाचेची कीड अक्षरशः लाचेची कीड लागली आहे. पैसे दिल्याशिवाय काम होत नसल्याचे चित्र निर्माण झाले. अमरावती विभागात येणाऱ्या पाच जिल्ह्यांमध्ये २०२४ या वर्षामध्ये लाचखोरीचे तब्बल ५० प्रकरणे दाखल झाले आहेत. या प्रकरणांमध्ये ७० लाचखोर अधिकारी, कर्मचारी व खासगी व्यक्ती अडकले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात लाच मागण्याच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. अमरावती विभागही त्यात मागे नाही. २०२४ या वर्षामध्ये १ ऑगस्टपर्यंत लाच प्रकरणाचे ४९ गुन्हे दाखल झाले आहेत. ६९ आरोपींचा समावेश आहे. त्यानंतर २ ऑगस्टला वाशिम येथे व्यापारी संकुलातील दुकानाच्या नोंदणीकृत भाडेपट्ट्यासाठी तब्बल सात हजारांची लाच स्वीकारणाऱ्या सहाय्यक मिळकत व्यवस्थापकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडून गुन्ह्याची पन्नाशी पूर्ण केली. यात एक आरोपी गजाआड आल्याने आतापर्यंत एकूण ७० आरोपी अडकले आहेत. हे सर्व गुन्हे लाच घेतांना सापळा रचल्याचे आहेत.

हेही वाचा : पीएसआय परीक्षेत ‘महाज्योती’चा अमोल घुटूकडे राज्यात प्रथम

लाचखोर प्रकरणाचे विभागातील सर्वाधिक गुन्हे अमरावती जिल्ह्यात घडले. अमरावती जिल्ह्यात १५ गुन्हे दाखल झाले आहेत. अकोला जिल्ह्यात आठ, यवतमाळ जिल्ह्यात ११, बुलढाणा जिल्ह्यात १० व वाशिम जिल्ह्यात सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एकूण ५० गुन्ह्यांसाठी ७० आरोपींना पकडण्यात आले. गेल्या वर्षी याच काळात ५२ सापळे रचण्यात आले होते. या वर्षात अपसंपदा व अन्य भ्रष्टाचाराचा एकही गुन्हा अमरावती परिक्षेत्रात दाखल झालेला नाही. शासकीय कामात लाचेची मागणी झाल्यास तक्रार करण्याकडे नागरिकांचा कल कमीच असल्याचे दिसून येते.

राज्यात लाचखोरीत ४४५ गुन्ह्यांमध्ये ६५९ आरोपी

संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी १ ऑगस्टपर्यंत ४४५ गुन्ह्यांमध्ये ६५९ आरोपी अडकले आहेत. त्यामध्ये सापळ्याचे ४२१ गुन्ह्यांमध्ये ६०८ आरोपी, अपसंपदाच्या २० गुन्ह्यांमध्ये ३९, तर अन्य प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांच्या चार प्रकरणांमध्ये १२ आरोपींची चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचा : वाझेच्या कुबड्यावर फडणवीसांचे माझ्यावर आरोप – अनिल देशमुख

अमरावती विभाग राज्यात चौथ्यास्थानी

राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या राज्यात आठ परिक्षेत्रामध्ये अमरावती विभाग कारवाईच्या संख्येमध्ये चौथ्यास्थानी आहे. लाचखोरांवर कारवाई करण्यात नाशिक परिक्षेत्र आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर पुणे, तर तिसऱ्या क्रमांकावर छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचा क्रमांक लागतो.

कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्यावतीने खासगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची संपर्क साधावा. पडताळणी कार्यवाही करून सापळा रचला जाईल.

गजानन शेळके (पोलीस उपअधीक्षक, वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, वाशिम)
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In amravati division 50 cases of bribery registered in the year 2024 in five districts ppd 88 css