भंडारा : तब्बल १२ महिन्यांपासून पगार झालेला नाही, घर लिलावात काढण्याची वेळ आली, बँकेचे कर्ज कसे फेडायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा करायचा? अशा मानसिक तणावातून जात असलेल्या एका शिक्षकाने अखेर आत्मदहनाचा टोकाचा निर्णय घेतला आहे. शिक्षणाधिकारी माध्यमिक, शाळेच्या मुख्याध्यापिका आणि वेतन अधिकारी हे हेतूपुरस्पर पगार काढण्यास टाळाटाळ करीत असल्याने येत्या ७ एप्रिल रोजी शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर आत्मदहन करणार असा इशारा या शिक्षकाने पालकमंत्री, शिक्षणविभाग यांना निवेदनातून दिला आहे.

विकास देवराम वंजारी हे यांच्या तक्रारीनुसार, ते २००४ पासून सरस्वती विद्यालय, शिंगोरी या शाळेत कार्यरत होते. मात्र शाळेची पटसंख्या शून्य झाल्याच्या कारणावरून १६ जानेवारी २०२५ रोजी त्यांचे समर्थ विद्यालय, लाखनी येथे समायोजन करण्यात आले. त्यांनी नियमितपणे अध्यापनाचे कार्य सुरू ठेवले असतानाही, मुख्याध्यापिका विभावरी निखाडे यांनी त्यांचे वेतन काढण्यास टाळाटाळ करीत आहेत. विशेष म्हणजे, समर्थ विद्यालयात २ महिन्यापूर्वी रुजू झाले असले तरी त्यापूर्वी एप्रिल २०२४ पासून १२ महिन्यांचा पगार थकीत आहे. नियमानुसार समायोजन झालेल्या शिक्षकांचे वेतन नव्या शाळेतून मिळणे आवश्यक असते. मात्र कोणतेही कारण नसताना पगार काढण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप वंजारी यांनी केला आहे.

देवी सरस्वती विद्यालय शिंगोरी ही अनुदानित माध्यमिक शाळा बंद करण्याचे शासनाचे आदेश नसतांना कार्यरत सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे एप्रिल २०२४ पासूनचे नियमित वेतन लेखी न कळविता शिक्षणाधिकारी रवींद्र सलामे प्रभारी व अधिक्षक वेतन पथक प्रभा दुपारे यांनी वेतन अडविल्याचा आरोप आहे.

शिक्षणाधिकारी, भंडारा सलामे, वेतन पथक अधीक्षक प्रभा दुपारे आणि समर्थ विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विभावरी निखाडे यांनी संगणमत करून आर्थिक अडचणीत टाकल्याचा आरोप विकास वंजारी यांनी केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून, गृहकर्ज थकीत राहिल्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया, भंडारा शाखेने त्यांच्या घराचा लिलाव जाहीर केला आहे. तसेच, मुलांचे शिक्षण, आरोग्य, आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या निभावणे कठीण झाले आहे, असे त्यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी मुख्याध्यापिका निखाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

विकास वंजारी यांचा पगार काढण्यात यावा यासाठी मुख्याध्यापिका यांना अनेकदा निर्देश देण्यात आले आहेत. त्यांचा १२ महिन्यांपासून पगार झालेला नाही यात तथ्य नाही. वंजारी यांनी केलेले आरोप तथ्यहीन आहेत.

रवींद्र सलामे, शिक्षणाधिकारी माध्यमिक, भंडारा.

या नावाच्या शिक्षकांना मी ओळखत नाही, त्या बद्दल मला काहीच कल्पना नाही.

प्रभा दुपारे, वेतन पथक अधीक्षक, भंडारा.