बुलढाणा: परतीच्या प्रवासात धुमाकूळ घालणाऱ्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील काही नदी नाल्यांना पूर आले. या पुरात तिघेजण वाहून गेले होते. यापैकी खामगाव तालुक्यातील एका युवकाचा मृतदेह तब्बल चार दिवसानंतर आज शनिवारी आढळून आला. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या बचाव आणि शोध पथकानी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी चिकाटीने तीन दिवस बेपत्ता युवकाचा शोध घेतला. दुसरीकडे देऊळगाव राजा तालुक्यातील पुरात वाहून गेलेल्या बाप लेकाचा अजूनही शोध लागला नाही. आज शनिवारी देखील बचाव पथक दोघांचा कसोशिने शोध घेतआहे.

२५ तारखेला वाहून गेला, २८ ला सापडला!

मागील २५ सप्टेंबर रोजी खामगाव तालुक्यातील काही महसूल मंडळात अतिवृष्टी ची नोंद झाली होती. यावेळी ओढ्याला आलेल्या पुरात खामगाव येथील प्रदीप श्रीरंग जाधव (वय ३० वर्षे ) हा रात्री आठ ते साडेआठ वाजे दरम्यान पुरात वाहून गेला. सावखेड तेजन ते खामगाव मार्गावरील पुलावरून रात्री तो पाण्यात वाहून गेला होता .महसूल प्रशासन, मंडळ अधिकारी, तलाठी व नातेवाईक, गावकरी यांनी २६ सप्टेंबर रोजी दिवसभर प्रदीप चा शोध घेण्यासाठी मोहीम राबवली तो सापडला नाही. मात्र त्यादिवशी सदर व्यक्तीची मोटरसायकल आणि बॅग ओढ्या मध्ये आढळून आली. दुसऱ्या दिवशी। २७ सप्टेंबर रोजी सकाळ पासून व्यापक शोध मोहिम राबविण्यात आली.यामध्ये एनडीआरएफ व महसूल प्रशासन , गावकरी यांनी घटनास्थळ असलेल्या खामगावच्या ओढ्यापासून ते किनगाव राजा पर्यंत प्रदीप चा शोध घेतला. मात्र त्यादिवशी सुद्धा तो सापडला नाही.

हेही वाचा : “लाडकी बहीण नव्हे, लाडकी खुर्ची योजना, तीनही भाऊ लबाड”, ठाकरे गटाच्या नेत्याने थेटच….

दरम्यान आज सलग चौथ्या दिवशी, शनिवारी पुन्हा रोजी सकाळी आठ वाजेपासून, गावकरी नातेवाईक महसूल प्रशासन एनडिआरएफ ने शोध घेणे सुरू केले. अखेर किनगाव राजाच्या पाताळ गंगेच्या पुलापासून पश्चिमेस अंदाजे दोनशे मीटर अंतरावर नदीच्या कडेला प्रदीप जाधव याचा मृतदेह आढळून आला आहे. जिल्हाधिकारी, निवासी उप जिल्हाधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख तारासिंग पवार आणि त्यांच्या चमूने ही कामगिरी बजावली.

हेही वाचा : चंद्रपूर: पाच गुराख्यांचा बळी घेतला, अखेर शार्प शुटरने पहाटेच…

देऊळगाव राजा मधील पिता पुत्र बेपत्ताच!

दुसरीकडे चार दिवसांपूर्वी देऊळगाव राजा तालुक्यातील उंबरखेड नजीक असलेल्या नाल्यामध्ये पिता पुत्र वाहून गेले होते. बेपत्ता झालेल्या या दोघांचा मात्र अजूनही शोध लागला नसुन आज शनिवारी, २८ सप्टेंबर रोजी देखील त्यांचा शोध घेण्यात येत आहे. बचाव, शोध पथक, महसूल प्रशासन, गावकरी आणि नातेवाईक संयुक्तपणे या दोघांचा शोध घेत आहेत. हे दोघे २५ सप्टेंबरच्या रात्री पुरात वाहून गेल्याची माहिती महसूल सूत्रांनी दिली आहे. व्यापक शोध मोहिमेदरम्यान त्यांची मोटरसायकल उंबरखेड येथील ओढ्याजवळ सापडली आहे. या दोन्ही व्यक्ती पिंपळगाव चिलमखा ( तालुका देऊळगाव राजा) येथील रहिवासी आहेत. दीपक प्रल्हाद निकाळजे (वय २९ वर्षे) आणि अथर्व दीपक निकाळजे (वय ५ वर्ष) अशी त्यांची नावे असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हा आपत्ती अधिकारी संभाजी पवार यांनी याला दुजोरा दिला आहे. शोध मोहीमेसाठी बचाव पथकाच्या आम्ही कायम संपर्कामध्ये आहोत. पोलीस व महसूल पथक तेथे थांबून शोध घेण्याचा युध्द स्तरावर प्रयत्न करीत असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे या घटनेमुळे पिंपळगाव चिलमखा ( तालुका देऊळगाव राजा) येथील निकाळजे परिवार, त्यांचे नातेवाईक आणि गावकरी हवालदिल झाल्याचे वृत्त आहे. त्या सर्वांची धाकधुक वाढली आहे.