चंद्रपूर: जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार सुरू असल्याने वर्धा, वैनगंगा, उमा, इरई, झरपट या नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली असून नदी, नाल्यांना पूर आला आहे. नागभीड तालुक्यात पूर पहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांसह दोन जण वाहून गेले. उमा नदीला पूर आल्याने पुराचे पाणी चिमूर शहरात शिरले. त्यामुळे चिमूर शहरात जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे. जिल्ह्यातील धरणे पूर्णपणे भरली आहेत. इरई धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आल्याने दुर्गापूर, पद्मापूर, किटाळी रहमतनगर, दाताळा व इरई नदी परिसरातील गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. ब्रम्हपुरी, चिमूर, नागभीड व सिंदेवाही या चार तालुक्यात ढगफुटी सारखा पाऊस झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात गुरुवार सायंकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील वर्धा, वैनगंगा, इरई, झरपट या प्रमुख नद्यांनी धोकादायक पातळी गाठली आहे. भद्रावती – माजरी मार्गावरील शिरणा नदीच्या पुलावर तसेच माजरी -पळसगाव -कुचना या मार्गावरील पुलावर पाणी आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ब्रम्हपुरी १९०.१ मि.मी. नागभीड १२० मि.मी., चिमूर १०७.१, सिंदेवाही १०२.४ या चार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने उमा व सतना नदीला पूर आला आहे. या पुराचे पाणी चिमूर शहरासह आजू-बाजूच्या गावात शिरले आहे. राजुरा, गोंडपिपरी तालुक्यातसुध्दा ढगफुटीसदृश्य पाऊस झाला.

हेही वाचा : Video: रुग्ण बेडवर आणि बेडखाली तलाव…नागपुरातील शासकीय रुग्णालयात…

इरई धरणाच्या वरच्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे इरई धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे इरई धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले आहेत. इरई धरणाचे पाणी वर्धा नदीला जावून मिळते. त्यामुळे इरई नदीलगत असलेल्या पद्मापूर, किटाळी, मसाळा, पडोली, यशवंतनगर, दाताळा, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिंचोली, कढोली, पायली, विचोडा, खैरगाव, चांदसुई, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती चारवट, कवठी, चेक तिरवंजा, देवाळा, चौराळा, हिंगनाळा, चिंचोळी, मिनगाव, वडगाव, चंद्रपुर, माना आणि इरई नदीच्या काठावर असलेल्या चंद्रपूर शहरातील रहमतनगर, बिनबा गेट नगिनाबाग परिसरातील नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे पाणी इरई नदी लगतच्या भागात येण्याची शक्यता असल्याने परिसरातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाण गाठण्याचे आवाहन चंद्रपूर विज औष्णिक केंद्राने केले आहे. गेल्या चोवीस तासात जिह्यात मुसळधार पाऊस झाला. चंद्रपूर शहात ३२.७ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली. मूल ६४.७ मि.मी. गोंडपिंपरी २३.५, वरोरा ४७.४, भद्रावती २८.६, चिमूर १०७.१, ब्रम्हपुरी १९०.१, नागभीड१२० मि.मी. सिंदेवाही १०२.४, राजुरा २७.६, कोरपना १८.४ , सावली ६८.६, बल्लारपूर ३०.५ , पोंभूर्णा २०.३ , जिवती १९.४ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली.

हेही वाचा : धक्कादायक! अफगाणी नागरिकांनी बनवले भारतीय मतदान कार्ड….

पूर पाहणे जीवावर बेतले

नागभीड तालुक्यातील विलम येथील रुणाल प्रमोद बावणे (१०) हा इयत्ता पाचव्या वर्गात शिकणारा मुलगा पुराच्या पाण्यात वाहून गेला. संततधार पावसामुळे विलम येथील नाल्यावरून पाणी वाहत होते. रूणाल हा पाणी बघण्यासाठी आला असता, पुलावरून धावत जात असताना पाण्याचा अंदाज न नाल्याने तो पुराच्या पाण्यात वाहून गेला. नागभीड तालुक्यातीलच बोथली येथील स्वप्नील दोनोडे हा पूर पहायला गेला असता तोल जावून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. भद्रावती तालुक्यातील खुंटवंटा तुकुम या नाल्यावर दुपारी १२ वाजताच्या दरम्यान अनिल केशवराव पेंदाम हा २० वर्षीय युवक वाहून गेला