गडचिरोली : जिल्ह्यातील कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे साधना जराते (२३) या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या पश्चात २ लहान मुले पोरकी झाली. महिला सशक्तीकरणाचे मोठ मोठे दावे करणारे सरकार आरोग्य सुविधा पुरविण्यात अपयशी ठरल्याचे चित्र असताना ९ जानेवारीला गडचिरोलीत कोट्यवधी खर्चून मोठा महिला सशक्तीकरण मेळावा घेण्यात येणार आहे. याकरिता जिल्ह्यात येणारे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री तरी ‘साधना’ला न्याय देणार काय, असा प्रश्न कुटुंबाने उपस्थित केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शासनाकडून गडचिरोलीच्या विकासाचे कितीही दावे केले जात असले तरी काही वर्षांपासून जिल्ह्यातील गरीब, आदिवासी जनतेच्या आरोग्याची होत असलेली हेळसांड लपलेली नाही. अशात ८ डिसेंबरला कारवाफा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शिबीर घेण्यात आले होते. यात साधना जराते यांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. दरम्यान, प्रकृती खालावल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु १० डिसेंबरला मध्यरात्री साधनाचा मृत्यू झाला. त्यांच्यापश्चात दोन लहान मुले पोरकी झाली आहे. याविषयी हिवाळी अधिवेशनात देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला. परंतु दोषींना वाचवण्यासाठी कनिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई करून प्रकरण दडपण्यात आले. जेव्हा की सुविधाच नसताना दुर्गम भागात अशाप्रकारचे शिबिर आयोजित करण्याचे आदेश देणारे जिल्हा आरोग्य अधिकारी अद्याप मोकळे आहे.

हेही वाचा : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात भाजपकडून धक्कातंत्र; भावना गवळी यांच्या ऐवजी महायुतीकडुन एका बड्या नेत्याच्या नावाची चर्चा !

मागील दोन महिन्यात प्रसूतीनंतर झालेल्या माता मृत्यूवर देखील प्रशासनाने बोटचेपी भूमिका घेतल्याने जिल्ह्यात महिला आरोग्याची स्थितीत अत्यंत दयनीय असल्याचे एकंदरीत चित्र आहे. आता ९ जानेवारी रोजी गडचिरोलीत महिला सशक्तीकरण जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून जिल्हाभरातील २५ हजाराहून अधिक महिलांना या मेळाव्यासाठी आणले जाणार आहे. यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे गडचिरोलीत उपस्थित राहतील. सरकारकडून एकीकडे महिला सशक्तीकरणाचा दावा करण्यात येत असताना दुसरीकडे अपुऱ्या आरोग्य सुविधा आणि आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे गडचिरोलीत होणाऱ्या महिलांच्या मृत्यूकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळेच वैद्यकीय क्षेत्रात अत्यंत साधारण समजल्या जाणाऱ्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर साधनाचा मृत्यू झाला. हा केवळ एकच महिलेचा प्रश्न नसून शेकडो साधनांचा अपुऱ्या आरोग्य सुविधेने बळी घेतला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ‘साधना’ला न्याय देणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : तलाठी भरतीचा निकाल जाहीर; उमेदवारांना २०० पैकी २१४ गुण, तर गैरप्रकार करणारे उमेदवारही उत्तीर्ण झाल्याने संताप

‘इव्हेंट’ करून मूळ प्रश्नांना बगल

“जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न गंभीर आहेत. वन्यप्राण्यांचे हल्लेदेखील वाढले. यात महिलांचा हकनाक बळी जातोय. परंतु, सरकारकडे त्यांच्यासाठी वेळ नाही. शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी खर्चून ‘इव्हेंट’ केल्याने महिलांचे सशक्तीकरण होणार नाही. मूळ प्रश्नांना बगल देऊन हे सरकार स्वतःच्या प्रचारात व्यस्त आहे. पालकमंत्री देवेंद्र फडणवीसांना जिल्ह्यासाठी वेळ नाही. ते नागपुरात बसून सर्व निर्णय घेतात. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील गरीब आदिवासी नागरिकांनी मदतीसाठी कुणाकडे जावे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे”, असे गडचिरोली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी म्हटले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In gadchiroli cm eknath shinde devendra fadnavis ajit pawar visit on 9 january woman death after surgery ssp 89 css