अकोला : जुने शहरातील हरिहर पेठ भागात जातीय वाद होऊन तणावाचे वातावरण असल्यावर चक्क पोलीस ठाण्यावरच विनापरवानगी मोर्चा काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल तीन आरोपींना अटक केली. अत्यंत संवेदनशील भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुने शहराच्या हरिहर पेठ भागात बुधवारी सायंकाळी पुन्हा एकदा वाद निर्माण झाला होता. त्यामध्ये एक जण किरकोळ जखमी झाला. या वादानंतर एका विशिष्ट समुदायाचे नागरिक रस्त्यावर उतरले होते. जुने शहर पोलीस व दंगल नियंत्रण पथकाने घटनास्थळावर धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. या भागात सोमवारी ऑटो रिक्षाचा एका दुचाकीला धक्का लागल्यावरून मोठ्या वादात पर्यवसान झाले होते. या वादावरून गाडगे नगर व हमजा प्लॉट येथील दोन वेगवेगळ्या समाजातील मोठे गट आमने-सामने आले. वाद आणखी वाढल्याने दोन्ही बाजूने तुफान दगडफेक आणि संतप्त जमावाकडून एक ऑटो रिक्षा व दोन दुचाकीची जाळपोळ करण्यात आली होती. पोलिसांकडून जमावाला पांगवण्यात आले.

दरम्यान, या घटनेतील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी ०९ ऑक्टोबरला करण शाहु यांच्या नेतृत्वात विनापरवाना मोर्चा जुने शहर पोलीस ठाण्यावर काढला. निवेदन देऊन मोर्चेकरी परत जात असतांना त्यांनी घटनेचा राग मनात धरून शेख जमीर शेख उमर यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी करण शाहू, सोनु शाहू, राज यादव, गजू मेकॅनिक, गुंजन पहेलवान व इतर यांचे विरूद्ध कलम १८९ (२), १९१ (२), १९०, १९६ (१), २९६, ११८ (१) प्रमाणे गुन्हा दाखल केला. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. करण शाहू यांनी विनापरवाना पोलीस ठाण्यावर मोर्चा काढल्याने त्यांच्यासह मोर्चात सहभागी झालेल्यांविरूद्ध कलम २२१, २२३, भा.न्या.सं. १३५ मुपोअ प्रमाणे गुन्हा दाखल करून पोलिसांनी कारवाई केली.

हे ही वाचा..बुलढाणा: बुधवार ठरला घातवार, विविध घटनांमध्ये सात जणांचा मृत्यू

निर्देशांचे पालन करा…अन्यथा

कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका व समाजमाध्यमांद्वारे आक्षेपार्ह पोस्ट टाकून जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण करू नये तसेच विनापरवाना मोर्चा, धरणे, आंदोलन, रॅली काढू नये, पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे व निर्देशांचे पालन करावे. अन्यथा संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जुने शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी दिला आहे.