नागपूर : उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात वाघांची अडवणूक झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वन विभागाला खडसावल्याने वन पर्यटनासाठी वन विभागाने नवी मानद कार्यप्रणाली तयार केली. त्यानुसार, आता नियमांचे उल्लंघन करणारे पर्यटक तसेच जिप्सी चालक आणि मार्गदर्शकांवर ३ हजार ते २५ हजारांपर्यंत दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ला यांनी शपथपत्राच्या माध्यमातून उच्च न्यायालयात ही माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या नवी मानद कार्यप्रणाली पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात लागू करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात ती लागू करण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही वन विभागाने न्यायालयात सांगितले. नववर्षाच्या पूर्वसंध्येला उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात पर्यटकांनी वाघांची अडवणूक केली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आणि वनविभागावर ताशेरेही ओढले. त्यानंतर वनपर्यटनासाठी मानद कार्यप्रणाली तयार करण्याकरिता विशेष समिती तयार करण्यात आली. बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीने मानद कार्यप्रणाली तयार करून न्यायालयात सादर केली. त्यात वनविभागाने जिप्सी चालकांऐवजी पर्यटकांच्या वर्तवणुकीवर बोट ठेवत वनपर्यटनाच्या नियमांबाबत पर्यटकांना अधिक जागृत करण्यावर भर दिला आहे.

हेही वाचा : चंद्रपुरात ४८ तासांत आणखी एका वाघाचा मृत्यू; ताडोबा बफरमधील…

जिप्सींच्या हालचालींवर ‘एआय’ची नजर

वनपर्यटनादरम्यान नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी वनविभाग येत्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) लक्ष ठेवणार आहे. सफारी वाहनांवर डॅश बोर्ड कॅमेरा लावणे, त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी विशेष अॅप तयार करणे आदी उपाययोजना प्रस्तावित आहेत. याशिवाय नियमावलीचे पालन होण्यासाठी प्रत्येक व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यात प्रोटोकॉल अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची शिफारस समितीने केली आहे. हा अधिकारी परिक्षेत्र वन अधिकाऱ्याच्या दर्जाचा असेल.

हेही वाचा : “अजितदादांनी प्रथम न्याय देण्याचे कार्य करावे,” संतोष देशमुख कुटुंबीयांची अपेक्षा

प्रथमच दंडाचा उल्लेख

वनविभागाच्या जुन्या नियमावलीत वाहन आणि प्राण्यांमध्ये २० मीटर अंतर होते, आता हे अंतर ३० मीटर करण्यात आले. दोन वाहनांमधील अंतर ५० मी. वरून ३० मीटर करण्यात आले आहे. सफारी वाहनांची गतीही २० वरून ३० किमी प्रतितास करण्यात आली आहे. नव्या नियमावलीत पहिल्यांदाच दंडाच्या रक्कमेचा स्पष्ट उल्लेख आहे. पूर्वी भ्रमणध्वनी मूक किंवा विमान मोडवर ठेवा असा नियम होता, मात्र आता भ्रमणध्वणी नेण्यावरच बंदी घालण्यात आली आहे. जंगल सफारीबाबतचे इतर नियम मात्र जवळपास सारखेच आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maharashtra fine up to rupees 25 thousand for violation of rules during forest tourism css