नागपूर : आमदारांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांची भूमिका संविधानाप्रमाणे न्याय देणारी असावी,असे मत शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे युवा नेते व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपूर येथे व्यक्त केले. आदित्य ठाकरे शुक्रवारी नागपूरमार्गे मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्याकडे रवाना झाले. त्यावेळी नागपुरात ते बोलत होते. शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाई संदर्भात ठाकरे यांना विचारणा केली असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
हेही वाचा : ‘तर भाजपला परिणाम भोगावे लागतील”, बच्चू कडू म्हणाले, मुख्यमंत्र्यांना हटविल्यास…
छिंदवाड्याला जाताना ठाकरे वाटेत सावनेर बाजार समिती यार्डमध्ये आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाचे संविधान प्रत्येकाला न्याय देणारे आहे. ते बदलण्याचा घाट भाजपने घातला आहे. ते आम्ही होऊ देणार नाही. ही लढाई मोठी आहे. राज्यात परिवर्तन घडविण्यासाठी महाविकास आघाडी एक आहे, असे ठाकरे सावनेरच्या कार्यक्रमात म्हणाले. यावेळी सावनेरचे आमदार व काँग्रेस नेते सुनील केदार उपस्थित होते.