नागपूर : वीस वर्षांपूर्वी एका ‘गे’ तरुणाने नागपुरात समलिंगी नागरिकांची संस्था उभी करण्याचा विचार केला आणि नागपूरच नव्हे तर विदर्भातील समलिंगी नागरिकांच्या आयुष्यात एक पहाट उगवली. तोपर्यंत नागपुरात ‘गे’ नागरिक नव्हते असे नाही, पण ते कधीच समोर आले नव्हते. पुण्यातील हमसफर ट्रस्टसोबत काम करताना आनंद चांदरांनी यांना नागपुरातही अशी संस्था सुरू व्हावी, असे तळमळीने वाटले आणि २००५ साली सारथी ट्रस्टचा जन्म झाला. या संस्थेचे जनक आनंद चांदराणी वयाच्या अवघ्या ५१ व्या वर्षी कधी परत न येणाऱ्या वाटेवरून निघून गेले आहे. त्यांचे शुक्रवारी निधन झाले.

आनंद चांदरानी कोण ?

समलिंगी नागरिकांच्या हक्कांसाठी, आरोग्यासाठी आणि अन्य अधिकारांसाठी लढणारी ‘सारथी ट्रस्ट’ ही संस्था नागपूरात सुमारे १९ वर्षांपूर्वी स्थापन झाली. आनंद चांदरानी यांनी ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अवघे आयुष्य समलिंगी व्यक्तींच्या हक्कांसाठी लढण्यात घालवले. समलिंगी व्यक्तींच्या आरोग्य, शिक्षण व नागरी हक्कांसाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली, उपक्रम राबवले व जनजागरणाचे कार्य केले. त्यांच्या पुढाकाराने विदर्भात समलिंगी व्यक्तींच्या चळवळी उभ्या झाल्या व समलिंगी व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मार्ग खुले होऊ लागले.

हेही वाचा: Achalpur Vidhan Sabha Constituency : बच्चू कडू यांची घोडदौड कायम रहाणार? महायुती-महाविकास आघाडीपुढे उमेदवार निवडीचे आव्हान

‘सारथी ट्रस्ट’ काय आहे ?

समलिंगी नागरिकांचे आरोग्य, त्यांचे शिक्षण, त्यांचे मुलभूत हक्क आदींसाठी लढणारी ही संस्था आहे. गुणवत्ता असतानादेखील निसर्गाच्या विरोधात जाणारे म्हणून समलिंगी व्यक्तींकडे पाहण्यात येऊ लागले. त्यांना समाजात जे स्थान मिळायला हवे ते मिळत नव्हते. कायदा आणि व्यवस्था या दोन्हीच्या कचाट्यात ते अडकले. त्यांच्याकडे उपेक्षित म्हणून पाहण्यात येऊ लागले. समाजदेखील त्यांना समजून घेण्यास तयार नसल्यामुळे अशा व्यक्तींना समजून घ्या, त्यांना माणूस म्हणून वागवा यासाठी ही संस्था लढा देत आहे. केवळ ‘गे’ नाही तर तृतीयपंथीय, लेस्बीयन, बायोसेक्स्युअल या वर्गात मोडणाऱ्या नागरिकांसाठी ही संस्था काम करते.

हेही वाचा: आरक्षणाच्या मुद्द्यावर गोवारी समाज पुन्हा आक्रमक, नागपुरात शक्तिप्रदर्शन

चांदरानींच्या प्रयत्नांना आता कुठे आकार, पण..

आनंद चांदराणी यांनी समलिंगी नागरिकांच्या आरोग्य, शिक्षण, मुलभूत हक्क व अन्य समस्यांसाठी अनेक लढे दिले आहेत. बऱ्याच अंशी त्यांना न्यायही मिळवून दिला आहे. गेल्या वीस- बावीस वर्षांच्या प्रयत्नांना आता आकार येताना दिसून येत होता. एक मनमिळावू, हंसतमुख व्यक्तिमत्त्वाचे धनी म्हणून आनंद चांदरानी यांच्याकडे पाहीले जात होते. त्यांच्या आईच्या निधनानंतर मात्र ते बरेच हळवे झाले होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव लता मंगेशकर रुग्णालयास दान करण्यात आले आहे.