नागपूर : मागील वर्षी जिल्ह्यात ४४० तर शहरात ३०८ असे एकूण ७४८ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. अशी माहिती ‘झीरो फॅटलिटी डिस्ट्रिक्ट रिव्ह्यू’ आणि जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठकीत देण्यात आली. बैठकीला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

बैठकीत ‘सेव्ह लाईफ’ स्वंयसेवी संस्थेचे प्रवीण तिवारी यांनी सादरीकरण केले व नागपूर शहर आणि ग्रामीण भागात झालेल्या अपघाताची तसेच संबंधित यंत्रणांना सूचविलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तिवारी म्हृणाले, या वर्षी अपघाताच्या संख्येत ४ टक्के घट झाली. नागपूर ग्रामीणमध्ये गतवर्षी ४४० जणांचा मृत्यू झाला. शहरामध्ये ३०८ मृत्यू झाले. गडकरी म्हणाले, अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताला त्वरित वैद्यकीय मदत मिळण्यासाठी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात यावी. जेणेकरून अपघातानंतरच्या ‘गोल्डन अवर’मध्ये अपघातग्रस्तांचा जीव वाचेल.

हेही वाचा : Video: चंद्रपुरात नदी-नाल्यांना पूर; पुलावरून कार वाहून गेली

बैठकीला जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. विपीन ईटनकर, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, नागपूर ग्रामीणचे पोलीस अध्यक्ष हर्ष पोद्दार, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि रस्ते सुरक्षा समितीचे सदस्य उपस्थित होते.

तर अधिकाऱ्यांवर कारवाई

शहर व जिल्ह्यात होणाऱ्या अपघाताची संख्या, अपघाताची कारणे आणि ‘ब्लॅक स्पॉट’ हे लक्षात घेता प्रशासनाकडून गांभीर्य दाखविले जात नाही. अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी योग्य उपाययोजना होताना दिसत नाही. महामार्गावर अपघात झाल्यानंतर नागरिक १०८ या रुग्णवाहिकांना फोन करतात. तेव्हा रुग्णवाहिकांचा व्यवस्थित प्रतिसाद मिळत नाही, हे गंभीर आहे.शासकीय यंत्रणा गंभीर्य दाखवत नसेल तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा यावेळी गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिला.

हेही वाचा : यवतमाळ : जुगार अड्डयावरील कारवाईला ‘नियमित तपासणी’चा मुलामा! ‘सोशल क्लब’वरील कारवाईबाबत प्रश्नचिन्ह

६५ टक्के मृत्यू युवा वर्गा गटातील

नागपूर जिल्ह्यात दरवर्षी सरासरी आठशे ते हजार लोकांचा अपघात मृत्यू होतो. देशातील ही आकडेवारी ५ लाखांच्या घरात आहे. यातील ६५ टक्के मृत्यू हा १८ ते ३५ या युवा वयोगटातील युवकांचा आहे. जिल्ह्यात अपघाताचे ‘ब्लॅक स्पॉट’ पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांनी अभ्यास करून निश्चित केले आहे. ‘सेव्ह लाईफ फाउंडेशन’नेसुद्धा ‘ब्लॅक स्पॉट’ची ओळख केली आहे. त्यावर काम सुरू असून समाधान असल्याचे गडकरींनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा : मुसळधार पावसाने गडचिरोलीत हाहाकार, तीन राष्ट्रीय महामार्गांसह ४१ मार्ग बंद

शाळकरी मुलांमध्ये जनजागृती

सध्या राज्यात अपघाताचा टक्का वाढला आहे. अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी शाळकरी मुलांमध्ये वाहतूक नियमांबाबत आणि अपघाताबाबत जनजागृती केल्या जाईल. ‘हीट ॲण्ड रन’ अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अपघाताचे दुसरे कारण हेसुद्धा आहे. अपघात कमी करण्यासाठी लोकसहभागासोबतच स्वयंसेवी संस्था, नगरसेवक, आमदार यांना सुद्धा सहभागी करण्याची गरज असल्याचे गडकरी यांनी सांगितले. शाळेतील मुलांचा अपघात होऊ नये म्हणून शाळेसमोरील रस्त्यावर विशेष वाहतुकीची डिझाईन करावी. तसेच शाळेसमोर वाहनांची गती कमी कशी होईल यावरही चर्चा सुरू असल्याचे गडकरी यांनी पत्रकारांना सांगितले.