नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विशेषत: पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली पुन्हा अराजकता पसरवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, असा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी केला. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे उद्घाटन शुक्रवारी सकाळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते झाले. यावेळी होसबळे यांनी वार्षिक अहवाल सादर केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्तमान परिस्थितीवर बोलताना ते म्हणाले, श्रीराम मंदिर प्रतिष्ठापना हा सुवर्णाक्षरात लिहिला जाणारा क्षण आहे. श्रीराम मंदिर निर्माणामुळे जगातील कोट्यवधी हिंदूंचे स्वप्न पूर्ण झाले आहे. हिंदू समाजामध्ये सध्या जागरूकता आणि उत्साहाचे वातावरण आहे. परंतु, दुसरीकडे काही गोष्टी राष्ट्रासमोर संकट म्हणून उभ्या ठाकल्या आहेत. काही विभाजनकारी शक्ती आपल्या राजकीय लाभासाठी देशात अशांती पसरवत आहेत. मणिपूर, संदेशखाली आणि देशातील अन्य अनुचित घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत. नुहू येथे विश्व हिंदू परिषदेच्या यात्रेवर मुस्लीम समूदायाकडून हल्ल्याच्या घटनेचा त्यांनी निषेध केला. चांद्रयान मोहीम, जी-२० शिखर संमेलन अशा घटनांमधून देशाची शक्ती जगाला दिसली. लोकसभा निवडणुकीमध्ये स्वयंसेवकांनी मतदानाचा अधिकार बजावताना इतरांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, शंभर टक्के मतदानावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा : जलसंधारण विभागाची परीक्षा रद्द, परीक्षेतील गैरप्रकारासाठी टीसीएस कंपनीच्या….

मणिपूरवर चिंता, संदेशखालीवरून टीका

मणिपूरमधल्या स्थितीने मैतेई आणि कुकी समाजामध्ये मोठी दरी निर्माण केली. समाजाचे असे विभाजन होणे चिंताजनक असून मणिपूरमध्ये संघाच्या स्वयंसेवकांकडून लोकांचे मनोबल वाढवण्याचे आणि त्यांना आवश्यक मदत करण्याचे प्रयत्न करत असल्याचेही होसबळे यांनी या अहवालात म्हटले आहे. संदेशखालीमध्ये अनुसूचित जाती व जमातीच्या महिलांवर अत्याचार झाला. स्वतंत्र भारतात अशी घटना घडत असताना बंगाल सरकारकडून दोषींना शिक्षा देण्याऐवजी त्यांच्या बचावाचे प्रयत्न होत असल्याचेही ते म्हणाले.

जाती जनगणना हे विकृत राजकारण

देशात काही महिन्यांपासून जातीय जनगणनेचा मुद्दा समोर आला आहे. काँग्रेस पक्षाने याला पाठिंबा दिला आहे. जातीय जनगणना या संवेदनशील विषयावर राजकारण करून समाजामध्ये विभाजनाचा प्रकार सुरू असल्याची टीकाही होसबळेंनी केली.

हेही वाचा : कराळे गुरुजी म्हणतात, ‘पैसे जुळवितो, तिकीट द्या…’, तर हर्षवर्धन देशमुख म्हणतात, ‘लढतो पण पैसे नाही…’ – पवार गटात संशयकल्लोळ

संघाविषयीची अल्पसंख्यांमधील भीती कमी होतेय – वैद्य

भारतातील १४० कोटी समाज हा हिंदूच आहे. आमचे पूर्वज हिंदू होते. आमची संस्कृती एक आहे. संघाच्या शाखांमध्ये अल्पसंख्याक आधीपासून आहेत. संघाविषयी अल्पसंख्यांमध्ये भीती निर्माण केली जात होती. आता ती हळूहळू कमी होत आहे. ते संघाच्या अधिक जवळ येत आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह सरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या उद्घाटनानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर उपस्थित होते. वैद्य म्हणाले, संघाच्या संकेतस्थळावर दरवर्षी ‘जॉईन आरएसएस’ म्हणून एक लाख विनंती अर्ज येतात. देशातील ९२२ जिल्ह्यांमध्ये म्हणजेच ९९ टक्के जिल्ह्यात तर ६५९७ तालुक्यांच्या ठिकाणी शाखा आहेत. संघाचे काम वाढत असल्याने दहा ते पंधरा गावांचा समूह घेऊन मंडळ तयार करण्यात आले असून ५८९८ मंडळांमध्ये शाखा सुरू आहेत. सध्या देशात ७३,१७७ नियमित शाखा सुरू असल्याचेही वैद्य यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nagpur rss leader dattatreya hosabale criticizes punjab farmers agitation dag 87 css