वर्धा : शनिवारी रात्री देवळी व अन्य तालुक्यांना गारांनी झोडपले, तर रविवारी सायंकाळी समुद्रपूर तालुक्यात गारपीट झाली. बोरांच्या आकाराच्या गारांनी शेतकऱ्यांच्या पिकांची प्रचंड हानी झाली. यामुळे बळीराजाचा मेटाकुटीस आला आहे. रविवारी सायंकाळी समुद्रपूर तालुक्यातील मारडा, कळमना, सालापूर, विखणी, दिग्रस या गावांत वरुणराजा गारांसह धोधो बरसला. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास एक कोसळलेल्या पावसाने व गारपिटीने चांगलाच कहर केला. देवळी तालुक्यातील इसापूर, रत्नापूर, फत्तेपूर, मुरदगांव, आंबाडा, काजळसरा, खर्डा, सोनोरा, भिडी, विजयगोपाल, इझांळा, कोल्हापूर, रोहणी, यासोबत जिल्ह्यातील इतरही गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. गारपीट, पाऊस व वादळी वाऱ्यामुळे गहू पूरता झोपला तर चण्याच्या घाट्या फुटल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतात पिकांवर गारांचे आच्छादन पसरले. पावसामुळे शेतात असलेला कापूस ओला झाला. तसेच फळबांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “गोंदिया जिल्ह्यातून नक्षलवाद संपला नव्हे, आम्ही संपवला”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावा; म्हणाले…

दरम्यान, वर्धा जिल्ह्यातील गारपीटग्रस्त शेतांची पाहणी करण्याकरिता खासदार रामदास तडस शेतांच्या बांधांवर पोहोचले. शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करावे, पंतप्रधान पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी, असे निर्देश खासदार तडस यांनी यावेळी दिले. यावेळी सरपंच सुधीर बोबडे, उपसरपंच सौरव कडू, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे सदस्य रमेश कडू, रत्नापूर भाजप अध्यक्ष सुनील खडसे, दिनेश आखुड, युनुस आली, सतीश बोबडे,नरेश शेंदरे, गोपाल तडस, शामराव आखुड,आकाश निंबोळकर, निलेश ठाकरे, पुरुषोत्तम नेहारे, मनोज भोयर, प्रमोद मडावी, जगदीश आखुडकार, सुधाकर आडे, सुधाकर राऊत, स्वप्नील कडू, गोविंद ठाकरे, सदाशिव उईके, संदीप नेहारे उपस्थित होते.

हेही वाचा : “नारी शक्तीच्या माध्यमातूनच विकसित भारताची पुढील वाटचाल होणार”, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा विश्वास

शेती निसर्गाच्या भरोशावर अवलंबून असते. निसर्गाच्या कोपामुळे नेहमीच शेतकऱ्यांना संकटांचा सामना करावा लागतो, शेतकऱ्यांच्या हाती येणारे पीक गारपिटीमुळे उद्ध्वस्त झाले. नुकसानग्रस्त शेतीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ प्राथमिक मदत द्यावी, एकही गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याकरिता शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार तडस यांनी सांगितले. पुढील कारवाई लवकरात लवकर करून योग्य नुकसान भरपाई त्वरित मिळण्याकरिता राज्य सरकारकडे विनंती करणार असल्याचे आश्वासन त्यांनी शेतकऱ्यांना दिले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In wardha at samudrapur village farmers crops damaged due to heavy hailstorm pmd 64 css