वर्धा : कुटुंबाची प्रतिष्ठा, समाज काय म्हणेल, नातेवाईकांचे टोमणे अशी भीती बाळगून प्रेम प्रकरणात स्वाभिमान जपण्यासाठी हत्या करण्याचे प्रकार अद्याप घडत आहे. जाती धर्माची भीती बाळगून पोटच्या गोळयास कायमचे संपविण्याचे कृत्य रागाच्या भरात केल्या जात असते.

या प्रकरणात तसेच झाले. स्वाभिमान जपण्यासाठी बापाने मुलीची हत्या तर केलीच पण तो प्रकार झाकण्यासाठी खोटी पोलीस तक्रार दिली. हमदापुर येथील विलास पांडुरंग ठाकरे याची मुलगी प्रणिता हिचे एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. त्यातून वडील व मुलीचे नेहमी भांडण होत होते. तशी तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल होती.

हेही वाचा…ओहरहेड वीज वाहिन्यात बिघाड, नागपुरात मेट्रोची सेवा विस्कळित

घटनेच्या दिवशी एकदा मुलीने वडिलांना जेवणाचे ताट वाढले. तेव्हा वडीलांनी आंब्याचा रस का केला नाही म्हणून वाद केला. त्यातच लाकडी दांड्याने मुलीच्या डोक्यावर प्रहार केले. ती जागेवरच मरण पावली. यावेळी आरोपी बापाने हुशारी दाखवीत स्वतः पोलिसांना फोन केला. मुलीने डोके आटपून आत्महत्या केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, पुढे तपासात ही माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी बापाने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले. त्याची दखल घेत दहेगाव गोसावी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश कामाले यांनी तपास व पुरावे गोळा करीत न्यायालयात आरोप पत्र सादर केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. पी. आदोने यांच्या न्यायालयात सुनावणी सुरू झाली. शासकीय अधिवक्ता एच.पी. रणदिवे यांनी एकूण बारा साक्षीदार तपासले.अनिल मोहोड, शेखर पाटील व राजेश कंगाले यांनी साक्षीदारांना न्यायालयात हजर करण्याची जबाबदारी पार पाडली.

हेही वाचा…आशियाई क्रीडा स्पर्धेत योगाचा समावेश होणार, केद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती

मुख्य प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून मुलीची आईच न्यायालयात हजर झाली. तिने आरोपी पतीची बाजू नं घेता मुलीच्या हत्ये बाबत घडामोड कथन केली. तसेच घटनास्थळी हजर महिला पंच, शेजारी महिला व अन्य साक्षीदार यांनी शासनाच्या बाजूने साक्ष दिली. त्यामुळे गुन्हा सिद्ध होण्यास मदत झाली. युक्तीवाद मान्य करीत माननीय न्यायाधीशांनी आरोपी विलास ठाकरे यास दोषी ठरविले.

हेही वाचा…वॉर्ड समितीच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांचे ‘लाडकी बहीण’वर नियंत्रण

खून प्रकरणी आजीवन कारावास तसेच व दहा हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आला. तसेच दंड नं भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास भोगण्याचे निर्देश न्यायाधीश महोदयांनी दिले आहे. त्यावेळी घडलेल्या या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली होती. पुढे मृत मुलीच्या आईने मुलीच्या बाजूने व पती विरोधात साक्ष दिल्याने चर्चा झाली होती.