वर्धा : पावसाळ्यात विद्युत प्रवाह विविध कारणांनी बंद पडण्याचा प्रकार नवा नाही. आधीच ग्रामीण भागात मर्यादित वीज पुरवठा व त्यातही पाऊस, वादळवारा, तारांवर झाडे पडणे असे प्रकार लाईन गेली रे अशी आरोळी ठोकण्यास कारणीभूत ठरत असतात. मात्र एक जगावेगळा प्रकार घडला. चक्क एका भल्यामोठया अजगरमुळे दहा गावांत अंधार पसरला. समुद्रपूर येथे एका भागात लग्नासाठी लॉन व मंगल कार्यालय आहे. त्यासमोर विद्युत पुरवठ्याचे नियमन करणारे रोहित्र आहे.

जाम ते समुद्रपूर मार्गावरील या विद्युत कंपनीच्या रोहित्रा जवळ घटनेच्या दिवशी एक अनाहुत पाहुणा आला आणि उजेडाचा खेळखंडोबा झाला. रात्री साडे आठ वाजता तिथेच काम करणाऱ्या मजुरांना एका धक्कादायी दृष्य दिसले. रोहित्राच्या खांबावर एक लांबलचक अजगर वरच्या दिशेने चढत असल्याचे दिसून आले. वरच्या भागात असलेल्या तारांना या अजगराचा स्पर्श झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. यावेळी उपस्थित गावातील सामाजिक कार्यकर्ते पंकज पर्बत यांनी हा धोका ओळखला. त्यांनी लगेच सर्पमित्र प्रफुल्ल कुडे व हर्षल उमरे यांना फोनद्वारे माहिती देत बोलावून घेतले.

हेही वाचा : चंद्रपूर : ‘जलजीवन’ची कामे अपूर्ण, तब्बल ३२ कंत्राटदारांना…

कुडे व उमरे हे खांबा जवळ पोहचताच त्यांनी अजगर जवळपास विद्युत तारांजवळ पोहचल्याचे दिसून आले. त्यांनी दक्षता घेत प्रथम वीज वितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विद्युत पुरवठा त्वरित खंडित करण्याची विनंती केली. पुरवठा खंडित झाला तेव्हा अजगर वरच्या टोकास वेढा देत बसला होता. त्यावर परत ३३ किलोव्हॅटचा विद्युत पुरवठा असल्याने वर चढण्याची हिंमत कोणी दाखवू शकले नाही. अजगराचा हा प्रताप वाऱ्याच्या वेगाने सर्वत्र पसरला. खांब्याजवळ चांगलीच गर्दी जमली.

हेही वाचा : पुन्हा कंत्राटी भरती; वैद्याकीय महाविद्यालये, रुग्णालयांतील ६,८३० पदांना शासनाची मंजुरी

शेवटी करायचे काय, असा प्रश्न पडल्यावर सर्पमित्र कुडे व उमरे यांच्या सह मंगेश थूल व रजत भुरे यांनी चर्चा करून उपाय शोधला. लांबलचक बांबू आणला आणि अजगरास टोचून त्यास खालच्या दिशेने वळविले. खाली येताच त्यास सहज ताब्यात घेतले. वनविभागाचे क्षेत्र सहाय्यक आर. पी. धनविज व वनरक्षक योगेश पाटील यांच्या ताब्यात त्या अजगरास सोपविले. या अधिकाऱ्यांनी मग अजगरास खुरसापार येथील जंगलात सोडले. लाईन गेली, लाईन गेली म्हणून गावात सूरू झालेला ओरडा अखेर बंद झाला. अजगर चढलेल्या रोहित्रा मार्फत लगतच्या दहा गावात विद्युत पुरवठा केल्या जातो. तो अजगरमुळे अपघात होण्याच्या भीतीने बंद करण्यात आला होता. दोन तास दहा गावात पसरलेला काळोख अखेर अजगराचा मुक्काम हलल्यावर दूर झाला.