यवतमाळ : आपल्या मुला, मुलीचा विवाह शाही पद्धतीने व्हावा, अशी प्रत्येकच आई-वडिलांची इच्छा असते. मात्र, अनेकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने इच्छा असुनही मुलांचे लग्न थाटामाटात करता येत नाही. मात्र ‘मानव सेवा हीच माधव सेवा’ या भगवान श्री सत्यसाई बाबांच्या उपदेशाने प्रेरीत होऊन येथील डॉ. प्रकाश नंदूरकर गेल्या ३० वर्षांपासून सर्वधर्मीय गरीब, गरजू कुटुंबातील मुला-मुलींचे शाही विवाह लावून देत आहेत.

आतापर्यंत या सामूहिक विवाह सोहळ्यात २२०० पेक्षा अधिक वधु-वरांचे शुभविवाह झाले आहेत. रविवारी स्थानिक हॉटेल वेनिशियन येथे बंगलोर येथील साई मेरु मथी ट्रस्ट व सत चिकित्सा प्रसारक मंडळ यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यसाई सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात सर्वधर्मीय १०८ जोडप्यांचा विवाह अतिशय थाटामाटात पार पडला. यावेळी नवविवाहित दांपत्यास मान्यवरांच्या हस्ते संसारपयोगी साहित्य भेट देवून सन्मानित करण्यात आले. मेळाव्याचे हे ३० वे वर्ष आहे.

हेही वाचा : गडचिरोलीत तब्बल २ हजार कोटींच्या भूखंडांना अवैध परवानगी ? अर्चना पुट्टेवारच्या अटकेंनंतर भूमाफिया अडचणीत

१९९४ पासून या सर्वधर्मीय विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. समाजातील सेवाभावी व दानशूर दात्यांच्या सहकार्याने हे कन्यादानाचे काम अखंड सुरू असून, आजवर दोन हजार २०० च्या वर विवाह पार पडले आहेत. रविवारी पार पडलेल्या विवाह सोहळ्यात सहभागी वर-वधूंना लग्नाचे कपडे, संसारोपयोगी वस्तू व वधूला सोन्याचे मंगळसूत्र भेट देण्यात आले.

या विवाह सोहळयात एकूण १०८ विवाह लावण्यात आले. त्यात ३५ बौद्ध व ७३ हिंदू धर्माच्या जोडप्यांचा सामावेश आहे. दोन्ही धर्माच्या रितीरिवाजाप्रमाणे हे विवाह लावण्यात आले. मुंबई येथील साईराम अय्यर यांच्या गायनाचा कार्यक्रम या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरला.

अवास्तव लग्न खर्च, खर्चिक रूढी व परंपरा यातून सर्व- सामान्य कुटुंबाची सामुहिक विवाह सोहळ्यामुळे सुटका झाली. अनेक आई-वडील मुलामुलींच्या लग्नाकरिता कर्जबाजारी होण्याचे थांबले. आता मुलीचे लग्न ओझे वाटत नाही, असे मत सोहळ्यात सहभागी पालकांनी व्यक्त केले.

हेही वाचा : राजकारण सहमतीचे असावे; सरसंघचालक मोहन भागवत यांचे सत्ताधारी, विरोधकांना आवाहन

तर सातत्य आणि हाती घेतलेल्या काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची इच्छाशक्ती असल्यानेच डॉ. नंदूरकर यांचे कार्य उत्तरोत्तर वाढत आहे, असे प्रतिपादन श्री सत्यसाई सामूहिक विवाह मेळावा आयोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी या सोहळ्यात बोलताना केले.

नवविवाहित जोडप्यांना शासकीय अनुदान व कन्यादान योजनेचा लाभ देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. संयोजक डॉ. प्रकाश नंदुरकर यांनी विवाह सोहळ्याची सुरुवात ते आतापर्यंतचा ३० वर्षाचा प्रवास मांडला. महाराष्ट्रात सामूहिक विवाह मेळाव्याची सुरूवातच सर्वप्रथम यवतमाळातून झाल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास प्रमूख अतिथी म्हणून बंगलोर येथील द्वारकानाथ स्वामी, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू वेणू माधव जोशी, गुजरात येथील साई भक्त हसमुख पांचाळ उपस्थित होते.