लोकसत्ता टीम

नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात जानेवारी ते मे २०२४ दरम्यान हिवतापाचे तब्बल १ हजार ५१४ रुग्ण आढळले. त्यापैकी ९७.२९ टक्के रुग्ण हे केवळ गडचिरोली आणि चंद्रपूर या दोन जिल्ह्यांतील आहेत. नागपूर जिल्ह्यात केवळ दोन रुग्णांची नोंद असल्याने येथील नोंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पुण्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा या सहा जिल्ह्यात जानेवारी ते मे २०२४ दरम्यान पाच महिन्यात हिवतापाचे तब्बल १ हजार ५१४ रुग्ण आढळले. त्यापैकी ३ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही रुग्णसंख्या २०२३ मध्ये समान कालावधीत १ हजार ५४२ होती. या रुग्णापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता.

आणखी वाचा-नागपूर : विद्यार्थ्यांना मेट्रोसाठी आता वाट बघावी लागणार नाही, सोमवारपासून…

पूर्व विदर्भातील मागील दोन वर्षांची तुलना केल्यास पूर्व विदर्भात हिवतापाची रुग्णसंख्या घटली असली तरी मृत्यू वाढलेले दिसत आहेत. यंदा गडचिरोलीत सर्वाधिक १ हजार ३०२ रुग्ण, चंद्रपूर जिल्ह्यात १७१ रुग्ण आढळले. भंडारा ४, गोंदिया ३३, नागपूर शहर १, नागपूर ग्रामीण १, वर्धा जिल्ह्यात २ रुग्णांची नोंद झाली. नागपूरच्या शहरी भागात केवळ १ आणि ग्रामीण भागात १ अशा दोनच रुग्णांना हिवताप झाल्याची नोंद असल्याने येथील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांकडून हिवतापाच्या नोंदी अचूक केल्या जातात का, हा प्रश्न येथील वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. दरम्यान, नागपूर आरोग्य उपसंचालक कार्यालयातील एका अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर या आकडेवारीला दुजोरा दिला.

हिवताप म्हणजे काय?

हिवताप हा परजीवी रोग जीवघेणा ठरू शकतो. हा रोग प्लाज्मोडीयम विवियाक्स, प्लाज्मोडीयम मलेरीई आणि प्लाज्मोडीयम ओव्हेल या विषाणूंमुळे होतो. अनाफीलीस नांवाच्या डासाच्या संक्रमणात्मक चाव्यातून तो पसरतो. संसर्गक्षम डासानं चावा घेतल्यानंतर १० ते १४ दिवसांनंतर माणसाला हा रोग होतो.

आणखी वाचा-नागपूर : पार्टीचा बेत; चिकन, मासोळी शिजवण्यावरून वाद अन् डोक्यात घातला दगड…

लक्षणे..

सामान्यतः हिवतापामुळे ताप, डोकेदुखी, उलट्या आणि इतर फ्लूसारखी लक्षणे दिसतात. हा परजीवी लाल रक्तपेशींना संक्रमित करुन नष्ट करतो त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, मळमळणे आणि शुध्द हरपणे यांच्यामुळे सहजपणे थकवा येतो. परजीवी हे रक्तातून मेंदूपर्यंत (सेरेब्रल मलेरीया) आणि इतर महत्वाच्या अवयवांकडे वाहून नेले जातात. गर्भधारणेच्या दरम्यान हिवताप झाल्यास आईला, गर्भाला आणि नवजात बाळाला मोठा धोका होऊ शकतो. गर्भवती महिला हिवतापाचा सामना करण्यात आणि जंतुसंसर्ग हटवण्यामध्ये कमी सक्षम असतात, त्यामुळे गर्भावर विपरित परिणाम होतो. इतरही बरीच गंभीर लक्षणेही संभवतात.

आणखी वाचा-अमरावती : ‘एसआरपीएफ’ भरती, मैदानी चाचणी दरम्यान उमेदवार जखमी

हिवतापाची स्थिती ( जानेवारी ते मे )

जिल्हा२०२३२०२४
नागपूर (श.)०१०१
नागपूर (ग्रा.)०३०१
भंडारा ०१०४
गोंदिया२९३३
चंद्रपूर५४१७१
गडचिरोली १,४५४१,३०२
वर्धा०००२