चंद्रपूर : केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाद्वारे चंद्रपुरातील २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या हवा गुणवत्ता निर्देशांकात मोठी घसरण झाली असून प्रदूषण वाढले आहे. २०२३ मध्ये ३६५ दिवसांपैकी ३३३ दिवस प्रदूषित आढळून आले असून केवळ ३२ दिवसच आरोग्यासाठी चांगले असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. प्रदूषणाचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
येथे दररोज २४ तास घेण्यात येणारा हवा गुणवत्ता निर्देशांक खालावला आहे. २०२३ मध्ये ३६५ दिवसांत चंद्रपूरमध्ये केवळ ३२ दिवस प्रदूषणमुक्तीचे ठरले आहे. १४१ दिवस कमी प्रदूषणाचे, १५१ दिवस जास्त प्रदूषणाचे, ३६ दिवस आरोग्यासाठी हानिकारक तर ०५ दिवस धोकादायक प्रदूषण होत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निरीक्षणाच्या आधारे ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
हेही वाचा – ‘मोबाईल चेक पॉईंट’च्या नावावर आठ तपासणी नाक्यांची भर? परिवहन खात्याचा निर्णय
चंद्रपूरच्या २०२३ वर्षातील ३६५ दिवसांत ३३३ प्रदूषित आणि केवळ ३२ दिवस आरोग्यदायी श्रेणीत आहेत. १४१ दिवस हे साधारण प्रदूषणाच्या श्रेणीत, १५१ दिवस हे माफक प्रदूषण श्रेणीत, ३६ दिवस अतिशय प्रदूषित श्रेणीत, तर ०५ दिवस हानिकारक प्रदूषणाच्या श्रेणीत आले आहेत. शहरात धोकादायक श्रेणीतील प्रदूषण नोंदवले गेले नाही. चंद्रपूर जिल्ह्यासोबतच, शहरात आणि औद्योगिक क्षेत्र खुटाळा येथे सतत वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्राद्वारे वायू प्रदूषणाची नोंद घेतल्या जाते. तिथे शहरापेक्षा जास्त प्रदूषण आढळून आले आहे. सदरची आकडेवारी शहरातील बसस्थानकाजवळ असलेल्या केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या केंद्रातील आहे. ही आकडेवारी शासकीय यंत्रणेद्वारे घेतली असल्याने अनेक ठिकाणी यापेक्षाही जास्त प्रदूषण पाहायला मिळते. २०२३ वर्षांतील पावसाळ्यातसुद्धा प्रदूषण आढळले. पावसाळ्यातील एकूण ४ महिन्यांतील १२२ दिवसांपैकी ९५ दिवस प्रदूषण होते. हिवाळ्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढले असून १२३ दिवसांपैकी १२२ दिवस प्रदूषण होते. उन्हाळ्यातील सर्वच दिवस प्रदूषण होते. उन्हाळ्यातील एकूण १२० दिवसांपैकी ११६ दिवस प्रदूषण होते.
या वर्षात जास्त आढळलेली प्रदूषके
वर्षातील ३६५ दिवसांत सर्वाधिक १६३ दिवस हे सूक्ष्म धूलिकण १० मायक्रोमीटरची प्रदूषके होते तर १५९ दिवस सूक्ष्म धूलिकण २.५ ची होती. ३३ दिवस कार्बन मोनोक्साइडचे प्रदूषण तर १६ दिवस जमिनीवरील धोकादायक ओझोन वायूचे होते. एक दिवस नायट्रोजन ऑक्साइडचे प्रदूषण आढळले.
हेही वाचा – वर्ध्यातून प्रियंका गांधी यांना लढवावे, कोणी केली मागणी वाचा…
यामुळे होते सर्वाधिक प्रदूषण
चंद्रपूर वीज केंद्र, वाहतूक आणि वाहनांचे प्रदूषण जास्त आहे. औद्योगिक प्रदूषणसुद्धा वाढले आहे. वाहनांचा धूर आणि धूळ, वाहतूक, कचरा ज्वलन, लाकूड, कोळसा ज्वलन, औद्योगिक क्षेत्रात कोळसा ज्वलन राख, दूषित वायू, जल, ध्वनी आणि वायू प्रदूषणामुळे चंद्रपूरकर गेल्या १० वर्षांपासून त्रस्त आहेत.