लोकसत्ता टीम अकोला : दिवाळी तोंडावर असताना अद्यापही पीक विमा नुकसान भरपाईची २५ टक्के अग्रिम रक्कम मिळाली नाही. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली असून जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. दरम्यान. संतप्त शिवसैनिकांनी गुरुवारी दुपारी कौलखेड मार्गावरील पीक विमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड केली. आणखी वाचा-नागपूर : कुणबी नोंदीबाबतचा संभ्रम दूर करा, काय म्हणाले तायवाडे? यंदा नैसर्गिक संकटामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन कापसाचा उतारा घटला आहे. इतरही पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने पिके वाहून गेली आणि जमीनही खरडून गेली. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. सोयाबीन, कपाशी आदी मुख्य पिकांचे सरासरी उत्पादन कमी झाले. बाजारातील भाव सुद्धा पडले आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला. पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासह विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी उपोषण सुरू केले. सर्व प्रतिकूल परिस्थिती असताना शासन, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दखल न घेतल्यास विमा कंपनीचे कार्यालय फोडण्याचा इशारा (उबाठा) शिवसेनेने दिला होता. पीक विम्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी अद्याप दखल घेतली गेली नसल्याचा आरोप करीत शिवसैनिकांनी गुरुवारी पीक विमा कंपनीच्या अकोला जिल्हा कार्यालयात तोडफोड केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.