डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा कार्यकाळ येत्या ४ सप्टेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे नव्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया सुरू झाली असून आज, २९ ऑगस्टला प्राथमिक स्तरावरील मुलाखती मुंबई येथे कुलगुरू निवड समितीद्वारे घेण्यात येणार आहे. २१ व्या कुलगुरूंसाठी ३२ जण स्पर्धेत असल्याची माहिती आहे. त्यातील पाच जणांची शिफारस केल्यावर अंतिम निवड राज्यपाल करतील. विदर्भातील कृषी प्रश्नांची जाण असणारे नवे कुलगुरू हवेत, असे मत कृषी तज्ज्ञ व शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना २० ऑक्टोबर १९६९ रोजी अकोल्यात झाली. विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या विद्यापीठाद्वारे कृषी शिक्षण, संशोधन व विस्ताराचे कार्य करण्यात येते. विद्यापीठाचे २० वे कुलगुरू डॉ. विलास भाले यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात तिन्ही क्षेत्रात विद्यापीठाने उल्लेखनीय कामगिरी करून भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या देशातील विद्यापीठाच्या क्रमवारीत मोठी झेप घेतली.
विद्यापीठ तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले. डॉ. भाले यांनी सर्वांशी समन्वय ठेवत विद्यापीठाला सामाजिक कार्याची देखील जोड दिली. त्यांचा कार्यकाळ ४ सप्टेंबर रोजी संपणार आहे.

हेही वाचा : समृद्धी महामार्गामुळे ५८६ हेक्टरचे सिंचन क्षेत्र बाधित ; शेतकरी अडचणीत

नव्या कुलगुरूंची निवड करण्यासाठी कुलगुरू निवड समिती गठित करण्यात आली. डॉ. अय्यप्पन यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय निवड समिती असून त्यात भारतीय कृषी संशोधन परिषदेचे संचालक आणि कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले हे सदस्य आहेत. कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी २९ मे रोजी जाहिराज प्रसिद्ध करण्यात आली.२७ जूनपर्यंत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. कुलगुरू पदासाठी देशाच्या विविध भागातील ३२ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा : नागपूर : उपमुख्यमंत्र्यांच्या शहरातील खड्ड्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘यमराज’ अवतरले रस्त्यावर

प्राप्त अर्जांची छाननी करून इच्छुक पात्र उमेदवारांना सोमवारी प्राथमिक स्तरावरील मुलाखतीसाठी मुंबईला बोलावण्यात आले आहे. निवड समिती त्या उमेदवारांच्या मुलाखती घेऊन राज्यपालांकडे शिफारस करणार आहेत. त्यानंतर कुलगुरूंची अंतिम निवड राज्यपाल करतील.
विदर्भात कृषी क्षेत्रात विविध समस्या व प्रश्न आहेत. कर्जबाजारीपणासह इतर अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा काळा डाग विदर्भाला लागला. शेतकरी आत्महत्याचे सत्र अद्यापही रोखता आलेले नाही. गत अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना भेडसावणारे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कृषी विद्यापीठाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते.

हेही वाचा : “तू चुकीच्या पक्षात आहेस, काँग्रेसमध्ये ये”, मित्राच्या ऑफरनंतर नितीन गडकरी म्हणाले होते…

कृषी विद्यापीठाकडून त्या प्रश्नांवर कार्य सुरू आहे. विदर्भातील पीक पद्धती, येथील वातावरण, शेतकऱ्यांचे प्रश्न-समस्या याची जाण असलेले कुलगुरू राहिल्यास विद्यापीठाद्वारे भरीव काम करता येऊ शकते. डॉ. विलास भाले यांच्या कार्यकाळात याचा सकारात्मक अनुभव आला. देशातील इतर भागातील कुलगुरू राहिल्यास संशोधन व विस्तार कार्यात अनेक अडचणी येतात. त्यांना पीक पद्धती व प्रश्नांची माहिती नसते. त्यामुळे नवे कुलगुरू किमान महाराष्ट्रातील रहिवासी व विदर्भातील कृषी प्रश्नांची जाण असणारे असावे, असा सूर कृषी तज्ज्ञ व शेतकऱ्यांमधून उमटत आहे.
‘डॉ.पं.दे.कृ.वि.’चे विद्यमान कुलगुरू डॉ. विलास भाले यांचा कार्यकाळ ४ सप्टेंबरला संपुष्टात येणार असल्याने त्यापूर्वी नव्या कुलगुरूंची निवड करण्याचे आव्हान राहणार आहे. पुढील सात दिवसांत नव्या कुलगुरूंची निवड प्रक्रिया पूर्ण न झाल्यास विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार इतर कुलगुरूंकडे जाण्याची शक्यता आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Interview today for post of chancelleor in dr punjabrao deshmukh agricultural university tmb 01