चंद्रपूर : राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाचा एक भाग असलेल्या ‘औद्योगिक गुंतवणुकीस पोषक वातावरण निर्मिती’ अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात उद्योगांना भरारी देण्यासाठी १२ कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. या उद्योगातून जिल्ह्यात १७ हजार ४३१ कोटींची गुंतवणूक होणार असून त्यातून थेट १४ हजार १०० रोजगार उपलब्ध होणार आहे.
नियोजन भवन येथे शुक्रवार ११ एप्रिल रोजी जिल्हा प्रशासन व जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने ‘डिस्ट्रीक्ट इन्व्हेस्टमेंट समिट -२०२५’ चे आयोजन केले होते. मंचावर माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., सीईओ विवेक जॉन्सन, उद्योग विभागाचे सहसंचालक गजेंद्र भारती, मैत्री संस्थेचे नोडल अधिकारी पद्माकर हजारे, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक अशोक खडसे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक ऋतुराज सूर्य, विनोद ठोंबरे उपस्थित होते.
यावेळी मुनगंटीवार म्हणाले, राज्याच्या उद्योग क्रांतीमध्ये चंद्रपूर जिल्हा अग्रेसर असावा. आज सामंजस्य करार झालेल्या १२ उद्योगांपैकी ७ स्टील उद्योग आहे. राज्यातील एकूण खनिज संपत्तीपैकी नागपूर विभागात ६० टक्के खनिज आहे, तर नागपूर विभागाच्या एकूण खनिजांपैकी ७५ टक्के खनिज संपत्ती चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आहे. विविध क्षेत्रातील उद्योग चंद्रपुरात यावे, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे. उद्योगांसाठी जागा, पाणी, व इतर मूलभूत सोयीसुविधा चंद्रपूरमध्ये उपलब्ध असल्याचे सांगितले.
जोरगेवार म्हणाले, चंद्रपूर जिल्हा देशाच्या मध्यभागी असून उद्योगांसाठी वीज, रस्ते, पाणी आणि जमीन येथे मुबलक प्रमाणात आहे. तसेच दळणवळणाच्या उत्तम सोयीसुविधा असल्यामुळे गुंतवणूकदार येथे येतात. जिल्ह्यातील ३५ हजार एकर जागा उद्योगांना द्यावी लागणार आहे. सामंजस्य करार झालेल्या उद्योजकांनी चंद्रपूरची निवड करून एक चांगले पाऊल टाकले आहे. येथील गुंतवणुकीमुळे तुमच्या उद्योगाची भरभराट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, उद्योजकांना जिल्हा प्रशासन पूर्ण सहकार्य करेल. या उद्योगांमुळे जिल्ह्यात रोजगारनिर्मिती होण्यास मदत मिळेल. जिल्ह्यात इन्व्हेंस्टमेंट प्रमोशन समिती स्थापन करण्यात आली असून या माध्यमातून अडीअडचणी सोडवण्यात येत आहे. यावेळी जिल्हाधिकारी आणि उद्योजकांचे प्रतिनिधी यांच्यात सामंजस्य करार करण्यात आले. प्रास्ताविक सहसंचालक गजेंद्र भारती यांनी केले. संचालक श्याम हेडाऊ यांनी तर आभार महाव्यवस्थापक ऋतुराज सूर्य यांनी मानले.
चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक गुंतवणूक
सामंजस्य करार करण्यात आलेल्या १२ कंपन्यांपैकी ७ उद्योग स्टील क्षेत्राशी संबंधित आहे. तर मायनिंग, बायोफ्युएल, रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग आणि केमिकल टेस्टिंग क्षेत्राशी संबंधित प्रत्येकी एक उद्योग आहे. विशेष म्हणजे, शासनाने नागपूर विभागाला १४ हजार कोटींचे लक्ष्य दिलेले असताना एकट्या चंद्रपूर जिल्ह्याने १७ हजार ४३१ कोटींची गुंतवणूक आकर्षित केली आहे. ही गुंतवणूक यावर्षी आतापर्यंत राज्यात कोणत्याही एका जिल्ह्याने आकर्षित केलेली सर्वाधिक आहे.
अशी होणार गुंतवणूक
१) दीनानाथ अलॉएड स्टील प्रा. लिमिटेड ५०० कोटी गुंतवणूक, ७०० रोजगार निर्मिती, २) डब्ल्यूसीएल भटाडी ७२९ कोटी गुंतवणूक, ४२५ रोजगार निर्मिती, ३) जी. आर. क्रिष्ण फेरो अलॉय प्रा. लि. ७५० कोटी गुंतवणूक, १००० रोजगार निर्मिती, ४) भाग्यलक्ष्मी स्पाँज प्रा. लि. १०५३ कोटी गुंतवणूक, ७५० रोजगार निर्मिती, ५) चमन मेटॅलिक लि. ४५० कोटी गुंतवणूक, ६५० रोजगार निर्मिती, ६) गोवा स्पाँज ॲन्ड पॉवर लि. २००० कोटी गुंतवणूक, १५०० रोजगार निर्मिती, ७) कार्निव्हल इंडस्ट्रिज प्रा. लि. ३२० कोटी गुंतवणूक, ५५० रोजगार निर्मिती, ८) पाटील रेल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. १०० कोटी गुंतवणूक, २५० रोजगार निर्मिती, ९) ग्रेटा एनर्जी लि. १०३१९ कोटी गुंतवणूक, ७००० रोजगार निर्मिती, १०) डीएनडी एन्टरप्रायजेस प्रा. लि. १०० कोटी गुंतवणूक, २५० रोजगार निर्मिती, ११) कालिका स्टील ॲन्ड पॉवर प्रा. लि. ११०० कोटी गुंतवणूक, १००० रोजगार निर्मिती, १२) जेपी असोसिएट्स लेबॉरटरीज १० कोटींची गुंतवणूक आणि २५ रोजगारनिर्मिती.