लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अकोला : लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर आता राज्यात काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या तयारीवर भर दिला आहे. राज्यातील सर्वच मतदारसंघातून पक्षाच्यावतीने निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांकडून काँग्रेसने अर्ज मागवले आहेत. १० ऑगस्टपर्यंत उमेदवारांकडून अर्ज स्वीकारण्यात येतील. या संदर्भात पक्षाचे प्रशासन व संघटन उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र पाठवले. सर्वच मतदारसंघातून इच्छूकांकडून अर्ज मागविण्यात आल्याने काँग्रेस स्वबळावर २८८ जागांवर मोर्चेबांधणी करीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली. प्रमुख राजकीय पक्षांसह इच्छुकांकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. काँग्रेसने सर्वाधिक १३ जागांवर विजय मिळवला. राज्यात काँग्रेसला मिळालेल्या यशामुळे पक्ष नेतृत्वाचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यातच आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मोर्चेबांधणी सुरु केली. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष म्हणून काँग्रेसने लोकसभा निवडणूक लढवली. आता विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून मविआमध्ये जोरदार रस्सीखेच होण्याचा अंदाज आहे. जागांवरून मतभेद होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेसने स्वबळाची देखील तयारी चालवल्याचे बोलले जात आहे.

आणखी वाचा-यवतमाळ : तब्बल एक लाख शेतकरी कर्ज प्रक्रियेच्या बाहेर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यास सुरुवात केली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया राबवली जात आहे. प्रदेश काँग्रेस कमिटी कार्यालयात १० ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज जमा करावे लागणार आहेत. विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारी अर्जासोबत सर्वसाधारण प्रवर्गासाठी २० हजार, तर अनु.जाती, अनु.जमाती व महिला इच्छुकांसाठी १० हजार रुपयांची रक्कम पक्षनिधी म्हणून जमा करावी लागणार आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीकडे सुद्धा इच्छुकांना अर्ज दाखल करता येतील. १० ऑगस्टपूर्वी ते अर्ज शुल्कासह प्रदेश कार्यालयाकडे सादर करणे जिल्हाध्यक्षांना बंधनकारक राहणार असल्याचे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आणखी वाचा-वर्धा : दानदाता व्यथित; आरोप झाल्याने दान दिलेली ४० एकर जमीन परत मागितली…

जिंकण्यासाठीच लढणार….

सर्व विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागविण्याच्या सूचना उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी जिल्हाध्यक्षांना दिल्या आहेत. राज्यात महाविकास आघाडीमध्ये प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने स्वबळावर देखील चाचपणी सुरू केल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रेसने विधानसभा निवडणूक गांभीर्याने घेतली असून नियोजनावर भर दिला जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Is congress building a front on 288 seats on its own for the assembly elections ppd 88 mrj
Show comments