लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भंडारा : जिल्ह्यात १९ ते २९ जुलै या कालावधीत अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामांतर्गत लागवड केलेल्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धान पिकाची शेती पुर्णतः पाण्याखाली बुडाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्यात युतीचे सरकार असून शिंदे – फडणवीस – पवार या सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनात जनहिताच्या मोठमोठ्या योजनांचा पाऊस पाडला. या योजनेतंर्गच सरकारला बहिणी लाडकी झाली, भाऊ लाडका झाला पण अतिवृष्टीमुळे हवालदिल झाला तो शेतकरी राजा. या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देताना “नाथा फरक करू नको रे”, अशी विनवणी लाखांदूर तालुक्यातील किरमटीच्या जयपाल भांडारकर या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना एका फलकाद्वरे केली आहे.

भंडारा जिल्ह्यात २७ जुलैच्या मध्यरात्री व २८ जुलै रोजी दिवसा १२ वाजेपर्यंत मुसळधार पाऊस बरसल्याने जनजीवन प्रभावित झाले. जिल्ह्यात सातही तालुके मिळून ९९ हजार ९९६ हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्यात आली होती. यात अतिवृष्टीमुळे २३ हजार २६० हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत. यात एकूण ५१९ गावांमधील शेतशिवाराचा समावेश असून त्यात ४९ हजार १९७ शेतकरी बाधित झाले आहेत. खरीप हंगामांतर्गत शेतकऱ्यांनी भात, सोयाबीन, तूर, कापूस व भाजीपाल्याचे लागवड केली होती. मात्र १९ ते २९ जुलै या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे खरीप हंगामांतर्गत लागवड केलेल्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आणखी वाचा-काय द्याचं बोला! कनिष्ठ अभियंत्याच्या लाचखोरीमुळे गडचिरोली बांधकाम विभागातील टक्केवारीची चर्चा…

आदेशानंतर महसूल प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण केले. यात भंडारा तालुक्यातील १२२, मोहाडी १०८, तुमसर ६, पवनी १२८, साकोली ४६, लाखनी २०, तर लाखांदूर तालुक्यातील ८९ गावांचे सर्वेक्षण झाले आहे. यामध्ये एकंदरीत ९९ हजार ९९६हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. त्यापैकी २३,२६० हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने जाहीर केली आहे. भंडारा तालुक्यात २६१९, मोहाडी ४१८१, तुमसर २७,५१७, साकोली ५०४, लाखनी १३१ तर लाखांदूर तालुक्यात सर्वाधिक १५,६१० शेतकऱ्यांच्या समावेश आहे.

“या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना एका एकरामागे पन्नास हजार रुपयाची मदत आणि शेतावरील पीक कर्ज माफ करा नाहीतर मुख्यमंत्रीसाहेब शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय कुठलाही पर्याय शिल्लक राहिला नाही. ज्या पद्धतीने तुम्हाला बहिणी लाडकी झाली आणि भाऊ लाडका झाला, त्या पद्धतीने मात्र शेतकऱ्याला परका करू नका आणि शक्यतो लवकर आम्हा शेतकऱ्याला नुकसान भरपाई आणि कर्जमाफीचा लाभ द्या, ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना माझी विनंती आहे” असे फलकावर लिहून या शेतकऱ्याने मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान केले आहे.

आणखी वाचा-नागपूर : सुनेचे टोमणे असह्य, मुलाच्या संसारात विघ्न नको म्हणून आई-वडिलांनी सोडले घर; भरोसा सेलने…

अतिवृष्टीमुळे संपूर्ण लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांची भात शेती ही पाण्याखाली गेली आहे. धान लागवडीसाठी शेतकऱ्यानी कर्ज काढले होते मात्र आता पाण्यामुळे शंभर टक्के पिकाचे नुकसान झाले असून शेतकऱ्याना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी. -जयपाल प्रकाश भांडारकर, युवा शेतकरी किरमटी

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jayapal bhandarkar farmer from kirmati in lakhandur taluka appealed to chief minister through placard ksn 82 mrj