बुलढाणा : येथे १९ सप्टेंबर रोजी पार पडलेला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’सन्मान सोहळा हा शासकीय कार्यक्रम राजकीय विधानांनी राज्यभरात गाजलाच, सोबतच जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानात या सोहळ्यामुळे झालेली अस्वच्छता आणि अन्नाच्या नासाडीमुळेदेखील हा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला.

जिल्ह्याचे प्रशासकीय आणि राजकीय मुख्यालय असलेल्या बुलढाणा येथे मागील गुरुवारी, १९ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह दिग्गज राजकीय नेते आले होते. बुलढाणा शहरातील विविध विकासकामे, शिवस्मारक यांसह विविध महापुरुषांच्या पुतळ्यांचे अनावरण आणि लोकार्पण यावेळी मुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर चिखली मार्गावरील शारदा ज्ञानपीठाच्या मैदानात मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान सोहळा पार पडला.

हे ही वाचा…“आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार; पण हिंसा, तेढ…” उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे मत

या सोहळ्यात हजारो लाडक्या बहिणींनी गर्दी केली होती. त्यांच्या क्षुधा शांतीकरिता खाद्यान्नाची पाकिटे वितरित करण्यात आली. अर्थात पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रम दणक्यात पार पडल्यावर लाडक्या बहिणी आपापल्या गावी परतल्या, मात्र जिजामाता महाविद्यालयाच्या मैदानावर अन्नाची पाकिटे, उष्टे अन्न आणि इतर पूरक साहित्यांचा अक्षरशः खच पडल्याचे दिसून आले. २० सप्टेंबर रोजी संपूर्ण मैदानावर खाद्यान्नाची पाकिटे उघड्यावर पडली होती. यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली. नेहमी स्वच्छ असलेल्या या मैदानात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरल्याचे चित्र होते. यामुळे अन्नाची विटंबना झालीच, सोबतच अस्वच्छतेनेही कळस गाठला.

मैदानात आलेले खेळाडू, विद्यार्थी, पोलीस-लष्कर भरतीचा नियमित सराव करणारे युवक-युवती आणि ‘मॉर्निंग वॉक’साठी आलेल्या नागरिकांना या अस्वच्छतेचा प्रचंड त्रास झाला, दुर्गंधी सहन करावी लागली.

हे ही वाचा…परिवहन आयुक्तांशी आरटीओ संघटनेची चर्चा निष्‍फळ; २४ सप्टेंबरपासून बेमुदत संप अटळ

अखेर शहरातील माऊली आणि ‘गुड मॉर्निंग ग्रुप’ने पुढाकार घेतला. ग्रुपचे सदस्य सुधाकर मानवतकर, मोहन दलाल, सुधीर भालेराव, राजेंद्र वानेरे, शंकर लोखंडे, अभिजित सवडकर, प्रकाश सावळे, कैलास मोरे, योगेश बांगडभट्टी, श्रीकांत जोशी, संजय कस्तुरे, बर्डे पाटील, सुरडकर, भोसले, मोरे या सामाजिक कार्यकर्त्यांनी मैदानात अस्तव्यस्त पडलेले अन्न, पाकिटे, बाटल्या, प्लास्टिक पिशव्या उचलून मैदान स्वच्छ केले. यामुळे हे मैदान पुन्हा नेहमीसारखे स्वच्छ झाले आणि शनिवारी हे मैदान पुन्हा खेळाडू, भरती उमेदवार, युवक-युवती, सकाळ-संध्याकाळ फिरण्यासाठी येणारे वृद्ध, प्रौढ नागरिकांनी गजबजलेले व प्रसन्न दिसून आले. सर्व खेळाडू आणि नागरिकांनी माऊली आणि ‘गुड मॉर्निंग ग्रुप’चे आभार मानले. संस्था चालकांनीदेखील या चमूचे कौतुक केले.