नागपूर : मराठी चित्रपटांना चित्रपटगृह मिळत नाही अशी वारंवार तक्रार मराठी चित्रपटसृष्टीकडून केली जाते. चित्रपटगृह न मिळाल्यामुळे मराठी चित्रपट हिंदी किंवा दाक्षिणात्य चित्रपटांसारखे चालत नसल्याचेही सांगितले जाते.

मराठीतील प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र जोशी यांनी आता यावर मोठे विधान केले आहे. मराठी चित्रपट न चालण्यासाठी प्रेक्षकच अधिक जबाबदार आहेत. महाराष्ट्रातील प्रेक्षक मराठी कलाकारांवर भरभरून प्रेम करतात. मात्र मराठी चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन बघण्याऐवजी घरीच टीव्हीवर किंवा भ्रमणध्वनीवर बघतात, अशी खंत अभिनेते जितेंद्र जोशी यांनी व्यक्त केली. चित्रपटगृहातील गर्दीच्या आधारावर मराठी चित्रपटांचे मूल्यांकन करणे यामुळे योग्य ठरणार नाही, असेही जोशी म्हणाले.

काय म्हणाले जोशी?

महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ, पुणे फिल्म फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि मेराकी परफॉर्मिंग आर्टस ऑर्गनायझेनशच्या सहकार्याने आयोजित २३ वा पुणे ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’च्या नागपूर पर्वाचा समारोप रविवारी झाला. मेडिकल चौकातील व्हीआर मॉलमध्ये आयोजित महोत्सवात मराठी चित्रपटांची वाटचाल या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.

परिसंवादात अभिनेते जितेंद्र जोशी, दिग्दर्शक निखिल महाजन, लेखक किरण यज्ञोपवित, चित्रपट अभ्यासक डॉ. अभिजीत देशपांडे यांनी सहभाग घेतला. मराठी प्रेक्षक बर्‍यापैकी दुटप्पी असतात. काही अपरिहार्य कारणाने घरात मराठी व बाहेर ग्लोबल होउ पाहतात, म्हणून थिएटरच्या गर्दीवर मराठी चित्रपटाचे मूल्यमापन करु नये. अनेक चांगल्या चित्रपटांचे ब्रँडिंगदेखील होत नाही. एकूणच समीक्षा संस्कृतीत चित्रपटविषयक अनेक बीजे दडली असतात. तसेच विषय उत्तम पण सिनेमॅटिक भाषा क्षीण असली तर चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाही, असा सूर या परिसंवाद कार्यक्रमातून उमटला. महाराष्ट्र हा मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांच्या पलिकडे देखील आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील समस्यांवर एक वेगळा चित्रपट तयार केला जाऊ शकतो, अशा भावना जितेंद्र जोशींनी व्यक्त केली.

मराठी चित्रपटांची सध्याची स्थिती खालावली आहे, मात्र एक दिवस पुन्हा सोन्याचे दिवस येतील, अशी आशा निखिल महाजन यांनी व्यक्त केली. चित्रपटगृहे न मिळण्याच्या समस्येवर भाष्य करताना अभिजीत देशपांडे यांनी सांगितले की राज्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी मराठी चित्रपट पोहोचू शकत नाही. चित्रपट निर्मितीसाठी भरमसाठ पैसा लागतो, मात्र लिखाणासाठी नव्हे, असे बोलताना त्यांनी कथालेखनावर भर दिला.

‘एआय’ चित्रपट क्षेत्रातील नोकऱ्या संपवू शकत नाही, मात्र चित्रपटसृष्टीने ‘एआय’ला डावलून चालणार नाही, असे मत किरण यज्ञोपवित यांनी मांडले. परिसंवादात सूत्रधाराची भूमिका अजेय गंपावार यांनी पार पाडली. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल देखील उपस्थित होते.

Story img Loader