अकोला : श्रावणमासातील आगळा-वेगळा उत्सव म्हणून अकोल्यातील प्राचीन कावड महोत्सवाने आपली विशिष्ट ओळख जपली आहे. अकोल्यातील पालखी व कावड महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रासह देशातील शिवभक्तांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. शेवटच्या श्रावण सोमवारी कावड महोत्सवात श्री राजराजेश्वराला हजारो भरण्याचा जलाभिषेक करण्यात येत आहे. त्यामुळे शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आले. हजारो कावडधारी शिवभक्त रविवारी गांधीग्रामकडे रवाना झाले होते. सोमवारी सकाळपासून जलाभिषेक केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रावणात महादेवाच्या दर्शनासाठी सर्वत्र भाविकांची गर्दी असते. अकोल्यातील राजराजेश्वराचा कावड महोत्सव पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक जमतात. राज्यात अन्य कुठल्याच शहरात कावड महोत्सव एवढ्या मोठ्या प्रमाणात व विविधांगी स्वरूपात साजरा होत नाही. कावडीने पाणी आणून शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला जलाभिषेक घालण्याची ७९ वर्षांची प्राचीन परंपरा आहे. शेवटच्या श्रावण सोमवारी अकोला शहरापासून सुमारे २१ किलोमीटरवरील गांधीग्राम (वाघोली) येथील पूर्णा नदीतून पाण्याने भरलेल्या घागरी कावडीला बांधल्या जातात. ही भव्यदिव्य कावड शिवभक्त खांद्यावर घेऊन २१ कि.मी.चे अंतर पायी चालत येतात. एकामागे एक अशा १४० कावडांनी गांधीग्राम ते अकोलापर्यंतचा रस्ता व्यापून घेतलेला असतो. एका रांगेत येणाऱ्या या मोठ्या कावडधारी पालख्या खूपच सुंदर व आकर्षक दिसतात. अगदी लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सर्वजण या पालखी सोहळ्यात अगदी भक्तिभावाने सहभागी होतात.

हेही वाचा – धक्कादायक..! अल्पवयीन नातवानेच केला पैशांसाठी आजोबाचा खून

कमीत कमी ११ भरण्यांची, तर जास्तीत जास्त शेकडो भरण्यांची कावड असते. सर्वांत मोठी कावड आणण्यासाठीही मंडळांमध्ये स्पर्धा रंगते. अनेक शिवभक्त मंडळ शंकराच्या विविध रूपांचे देखावे महोत्सवात साकारतात. बाबा अमरनाथ, त्र्यंबकेश्वर, भैरवनाथ, राजराजेश्वर, ओंकारेश्वर आदी रूपे उत्सवात दिसून येतात. या सर्व पाण्याने भरलेले भरणे बांबूंनी बांधलेल्या एका ढाच्यावर लटकवून त्या खांद्यावरून वाहून हे हजारो शिवभक्त अकोल्यातील राजेश्वर मंदिरापर्यंत आणतात. या सर्व भरण्यातील पाण्याने महादेवाला जलाभिषेक घातला जातो. या कावडधारी शिवभक्तांसाठी गांधीग्राम ते अकोला या रस्त्यावर स्वयंसेवी संघटनातर्फे ठिकठिकाणी उत्स्फुर्त स्वागत केले जाते. ढोल-ताशाच्या निनादात, गुलाल उधळत, ‘हर हर महादेव…’ च्या गजरात खांद्यावर काही क्विंटलचे ओझे घेऊन शिवभक्त मोठ्या आनंदात महोत्सव साजरा करतात.

या महोत्सवाची ख्याती संपूर्ण राज्यात असून शिवभक्त मोठ्या संख्येने राजराजेश्वर नगरीत दाखल होतात. महोत्सवासाठी अकोल्यात जय्यत तयारी करण्यात आली असून, शिवभक्त रविवारी दुपारपासूनच गांधीग्रामकडे रवाना झाले होते. सोमवारी सकाळपासून शिवभक्तांचे स्वागत करण्यात येत आहे. दरम्यान, यावर्षीसुद्धा पालखी व कावडधारी शिवभक्तांपुढे खडतर मार्गाचे आव्हान होते. या खडतर मार्गावरूनच शिवभक्तांना मार्गक्रमण करावे लागले. अनेक ठिकाणी दुरुस्तीचे कार्य करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून मार्गात आरोग्य सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

हेही वाचा – पोलीस कर्मचारी प्रवीण आखरे यांचा आगळावेगळा विक्रम; ६२ मिनिटे पाण्‍यात उभे राहण्‍याची कामगिरी

शेकडो भरण्यांचे लक्ष्यवेधी कावड

गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या पाण्याने श्री राजेश्वराला जलाभिषेक करण्याची प्राचीन परंपरा जोपासली जात आहे. खांद्यावरून सर्वाधिक भरणे आणण्याची स्पर्धा कावडधारी शिवभक्तांमध्ये रंगते. महोत्सवात त्याचे विशेष आकर्षण आहे. डाबकीरोडवासी मित्र मंडळ, हरिहरपेठमधील जय भवानी मित्र मंडळ, हरिहर शिवभक्त मंडळ, जय बाभळेश्वर शिवभक्त मंडळाची कावड लक्ष्यवेधी ठरेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know the history significance of the biggest kavad festival in akola district of maharashtra ppd 88 ssb
Show comments